सांगली जिल्ह्यातील पिकांचा पंचनामा पूर्ण !

  • २९१ गावांतील ५१ सहस्र हेक्टर शेती बाधित !      

  • ९६ सहस्र १८६ शेतकरी आपत्तीने प्रभावित !

सांगली, २ ऑक्टोबर (वार्ता.) – जिल्ह्यात २६ आणि २७ सप्टेंबर या दिवशी दिवसभर झालेल्या अतीवृष्टीमुळ २९१ गावांतील ५१ सहस्र ३८७ हेक्टर शेती बाधित झाली, तर ९६ सहस्र १८६ शेतकरी प्रभावित झाले. कवठेमहांकाळ, आटपाडी, तासगाव या दुष्काळी तालुक्यांना सर्वाधिक हानी झाली आहे. पिके, बागायती आणि फळबागा यांची पाण्यात बुडून हानी झाली.

१. थेट बांधावर जाऊन पंचनामे करण्याची प्रक्रिया महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाने संयुक्तपणे चालू केली असून अंतिम अहवालानुसार शेतकर्‍यांना साहाय्य करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

२. जिल्ह्यातील २२ मंडलात अतीवृष्टी नोंदवली गेली आहे. जिल्हाभर मुसळधार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी उभी पिके पाण्यात गेली. काढणी, मळणीला आलेली पिके बुडून कुजून गेली.

३. फळबागांनाही मोठा फटका बसला आहे, असा अहवाल कृषी विभागाने अंदाजानुसार घोषित केला आहे.

४. मिरज तालुक्यातील २२, तासगावमधील ६९, कवठेमहांकाळमधील ६०, वाळव्यातील १७, अपर आष्ट्यातील २, शिराळा येथील १, विटा येथील ३८, आटपाडी ६०, तर जत आणि संखमधील ४४ गावे बाधित झाली आहेत.

५. मिरज तालुक्यातील बागावती १ सहस्र ५०२ हेक्टर, फळपिके २७ हेक्टर बाधित झाली आहेत. तासगाव तालुक्यात ३ सहस्र २६० हेक्टर बागायती, तर २ सहस्र ७५० हेक्टर जिरायती आणि २ सहस्र ८५० हेक्टर फळपीक बागांची हानी झाली आहे.

६. कवठेमहांकाळ तालुक्यात ४ सहस्र ८०२ हेक्टर जिरायती, १३ सहस्र ३०२ हेक्टर बागायती, तर ३ सहस्र ८८१ हेक्टर फळपिकांना पावसाचा फटका बसला आहे. वाळवा तालुक्यातील एकूण ५५ हेक्टर क्षेत्र बाधित आहे.