घरपट्टीच्या नोटिसीतील जाचक अटी आणि कालमर्यादा रहित करावी ! – ‘व्यापारी एकता असोसिएशन’ची मागणी

सांगली, ३ जून (वार्ता.) – सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात मालमत्ताधारकांवर लादण्यात आलेल्या अवाजवी करवाढीमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. महापालिकेकडून दिल्या जाणार्‍या घरपट्टीच्या नोटिसांमधील जाचक अटी आणि मर्यादित कालावधी रहित करण्यात यावा, अशी मागणी ‘व्यापारी एकता असोसिएशन’ने केली आहे, तसेच नागरिकांना यावर विचार करण्यासाठी आणि आक्षेप घेण्यासाठी वेळ देण्यात यावा, असेही असोसिएशनने स्पष्ट केले आहे.

‘व्यापारी एकता असोसिएशन’चे समीर शहा यांनी प्रसिद्धीपत्रकात प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी नागरिकांची बैठक बोलावून या करवाढीचे सादरीकरण केले होते. ‘जोपर्यंत नागरिकांचे पूर्ण समाधान होत नाही, तोपर्यंत अंतिम मागणीपत्र दिले जाणार नाही’, असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते; मात्र प्रत्यक्षात नागरिकांना पाठवलेल्या नोटिसांमध्ये २१ दिवसांनंतर कोणतीही हरकत स्वीकारली जाणार नाही, असे नमूद करून महापालिकेने हुकूमशाही वृत्ती दाखवून दिली. महापालिकेच्या विश्वासघातामुळे जनतेमध्ये संताप आहे. नोटिसीमध्ये नागरिकांकडून पुन्हा एकदा अनेक प्रकारची कागदपत्रे मागितली जात आहेत. वास्तविक पहाता जेव्हा मालमत्तेची किंवा घरपट्टीची प्रथम नोंदणी केली जाते, तेव्हा सर्व कायदेशीर कागदपत्रांची कसून निश्चिती केलेलीच असते. असे असतांना केवळ करवाढीच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरून नव्याने कागदपत्रे मागण्याचा अनाठायी प्रपंच महापालिका का करत आहे ? असा रोखठोक प्रश्न व्यापारी संघटनेने उपस्थित केला आहे.