अभाविपच्या वतीने शिवाजी विद्यापिठाच्या कुलगुरूंच्या दालनात घुसून आंदोलन !

विविध समस्यांसाठी आंदोलन

विद्यापीठ प्रशासनास निवेदन देतांना अभाविपचे पदाधिकारी, कार्यकर्ते

कोल्हापूर, १९ सप्टेंबर – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोल्हापूर शाखेकडून विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांसाठी शिवाजी विद्यापिठाच्या कुलगुरूंच्या दालनात घुसून आंदोलन करण्यात आले. ३ घंटे आंदोलन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी लेखी स्वरूपात मागण्यांची पूर्तता करण्याचे पत्र घेऊनच आंदोलन थांबवण्यात आले.

विद्यापिठाच्या विद्यार्थी विकास विभागांतर्गत दिली जाणारी ‘विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचारी कल्याण निधी योजना’ प्रतिवर्षी कार्यान्वित असून या अंतर्गत पालकांच्या नैसर्गिक किंवा आकस्मिक मृत्यूसाठी विद्यार्थ्यांना रितसर आवेदन केलेल्या आणि संमती मिळालेल्या विद्यार्थ्यांना कल्याण निधीचा लाभ घेता येतो. असे असतांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या कालखंडात ५९ विद्यार्थ्यांना ‘विद्यार्थी कल्याणनिधी’पासून वंचित रहावे लागले. विद्यापिठातील मुलांच्या वसतीगृहात व्यायामशाळेत व्यायामाचे साहित्य योग्यरित्या काम करत नाही. मानसशास्त्रीय विभागाच्या विद्यार्थ्यांना ओळखपत्रे मिळालेली नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना ग्रंथालयामध्ये संदर्भ पुस्तक मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. विद्यापिठाच्या अशा विविध अनागोंदी कारभाराविषयी आंदोलन करण्यात आले.

या प्रसंगी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विभाग संयोजक दीपक नडमाने, जिल्हा संयोजक वेदांत कुलकर्णी, महानगरमंत्री ऋषिकेश थोरात, जिल्हा सहसंयोजक प्रेम राजमाने, विद्यार्थी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

विद्यार्थ्यांना सुविधा मिळवण्यासाठी आंदोलन करावे लागणे, हे विद्यापीठ प्रशासनाला लज्जास्पद !