गोव्यातील सर्व दुर्लक्षित गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्य करण्याचा ‘मर्दनगड संवर्धन समिती’च्या बैठकीत निर्णय

दिवाळीनिमित्त राज्यस्तरीय किल्ला बांधणी स्पर्धा आयोजित करणार

‘मर्दनगड संवर्धन समिती’च्या बैठकीत मान्यवर

फोंडा, १० सप्टेंबर – गोव्यातील सर्व गडकिल्ले, तसेच गडकिल्ल्यांचा इतिहास आणि संस्कृती यांचे संवर्धन करणे , यांसाठी मर्दनगड संवर्धन समितीने संघटित अन् प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. मर्दनगड संवर्धन समितीची नुकतीच ढवळी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सभागृहात बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मर्दनगड संवर्धन समितीचे श्री. राजेंद्र देसाई आणि सौ. सुप्रिया केतकर; ‘बजरंग दला’चे गोवा राज्य संयोजक श्री. विराज देसाई, इतिहासकार श्री. सचिन मदगे, हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य संघटक श्री. सत्यविजय नाईक, गोवा राज्याचे माजी निवडणूक आयुक्त श्री. नारायण नावती, गोमंतक मंदिर महासंघाचे

श्री. जयेश थळी, श्री. संकेत आर्सेकर, तसेच गोव्यातील इतिहासप्रेमी, शिवप्रेमी, कलाप्रेमी आणि आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती. फोंडा येथील मर्दनगडच्या संवर्धनासाठी केलेल्या कामाची माहिती देणे आणि भविष्यातील अशा उपक्रमांसाठी दिशा ठरवणे, या हेतूने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीच्या प्रारंभी श्री. सत्यविजय नाईक यांनी मर्दनगड संवर्धन समितीने केलेल्या कामाची माहिती सर्वांपर्यंत पोचवण्याचे महत्त्व विशद केले. बैठकीत शिवप्रेमी संघटनेचे श्री. इच्छित फळदेसाई यांनी दिवाळीनिमित्त राज्यस्तरीय किल्ला बांधणी स्पर्धा आयोजित करण्याची कल्पना मांडली आणि स्पर्धेचा आराखडाही सादर केला. या उपक्रमाला उपस्थितांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला. या स्पर्धेमुळे तरुणांमध्ये ऐतिहासिक किल्ल्यांविषयी जागरूकता वाढेल, अशी आशा या वेळी व्यक्त करण्यात आली. या उपक्रमाची कार्यवाही, तसेच गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचे कार्य यांसाठी  ‘अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटना’ या नावाने पुढीलप्रमाणे कार्यकारिणी समितीची निवड करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष श्री. संकेत आर्सेकर असून उपाध्यक्ष श्री. राजेंद्र देसाई आणि श्री. सत्यविजय नाईक; कोषाध्यक्ष श्री. सुजय देसाई, तसेच सदस्य सर्वश्री सुचेंद्र अग्नी, जयेश थळी, विराज देसाई, मनोज गावकर, गोविंद गोवेकऱ, गौरिश कवळेकर, नवदीप नाईक आणि सौ. सुप्रिया केतकर आहेत. सल्लागार समितीमध्ये सर्वश्री नारायण नावती, नारायण नाडकर्णी, संजय देसाई, विश्वास प्रभु आणि सचिन मदगे यांचा समावेश आहे. या समित्या लवकरच त्यांच्या कामाला प्रारंभ करणार असून या कार्याला नवी दिशा देणार आहेत.