Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी पाकच्या युद्धनौकांनी कराचीवरून पलायन केल्याचे उघड !

भारताच्या क्षेपणास्त्रांच्या भीतीमुळे इराणजवळील ग्वादर बंदरावर लपल्या

ग्वादरच्या बंदरावर उभ्या असलेल्या पाकिस्तानी नौदलाच्या युद्धनौका (उपग्रह छायाचित्र सौजन्य :(MAXAR आणि INDIA TODAY) )

नवी देहली – ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी पाकच्या युद्धनौका इराणच्या समुद्रकिनार्‍याजवळ जाऊन लपल्या होत्या, अशी माहिती आता पुढे आली आहे. या संदर्भात उपग्रहाद्वारे काढण्यात आलेले छायाचित्र पहिल्यांदा समोर आले आहे. यातून पाक ऑपरेशन सिंदूरच्या वेळी किती घाबरला होता, हे स्पष्ट होते.

१. पाकच्या कराची बंदरातील या युद्धनौकांनी इराणच्या सीमेजवळील समुद्रकिनार्‍याजवळ शरण घेतल्याचे दिसून आले आहे. कराचीपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्वादर बंदरात पाकिस्तानच्या मुख्य युद्धनौका थांबल्या होत्या. भारतीय क्षेपणास्त्रांच्या मार्‍यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्या येथे पोचल्या होत्या. ग्वादर हे पाकिस्तानी बंदर असून ते इराणच्या सीमेजवळ आहे.

२. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारतीय नौदल अरबी समुद्रात तैनात करण्यात आले होते; मात्र त्यांनी प्रत्यक्षात यात सहभाग घेतला नव्हता. जर त्यांना आदेश मिळाला असता, तर त्यांनी ग्वादर बंदरावर आक्रमण करून पाकच्या युद्धनौकांना बुडवले असते. वर्ष १९७१ च्या युद्धात भारतीय नौदलाने कराची बंदर आणि तेथील तेलाचे साठे, तसेच युद्धनौका यांची प्रचंड मोठी हानी केली होती.

संपादकीय भूमिका

ऑपरेशन सिंदूरच्या वेळी पाकच्या सैन्याला पूर्णपणे नष्ट करण्याची सुवर्णसंधी होती आणि ती भारताने गमावली, असेच यावरून पुनःपुन्हा वाटत आहे !