Gadchiroli Naxals : गडचिरोलीत १० वर्षांत ३८३ नक्षलवादी आक्रमणांत १३४ नागरिकांच्या हत्या !

  • भारतातील सर्वाधिक नक्षलग्रस्त ६ जिल्ह्यांतील एक जिल्हा आहे गडचिरोली !

  • गेल्या ४ वर्षांत नक्षलवाद्यांची आक्रमणे, तसेच त्यांनी केलेल्या हत्यांच्या संख्येत ६७ टक्क्यांची घट !

मुंबई, १६ ऑगस्ट (वार्ता.) – भारतातील सर्वाधिक नक्षलवादग्रस्त जिल्ह्यांतील एक जिल्हा म्हणजे महाराष्ट्रातील गडचिरोली ! वर्ष २०१५ पासून एप्रिल २०२५ पर्यंत नक्षलवाद्यांनी या जिल्ह्यात ३८३ आक्रमणे करून १३४ नागरिकांची हत्या केली. या कालावधीत पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या कारवायांमध्ये १८७ नक्षलवादीही मारले गेले, अशी माहिती ‘सनातन प्रभात’चे विशेष प्रतिनिधी श्री. प्रीतम नाचणकर यांना माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत गृहविभागाकडून प्राप्त झाली आहे. वर्ष २०२१ पासूनची आकडेवारी पहाता नक्षलवाद्यांनी केलेली आक्रमणे, तसेच त्यांत मारल्या गेलेल्या नागरिकांच्या संख्येत किमान ६७ टक्क्यांची घट दिसून आली.

गेल्या १० वर्षांत नक्षलवाद्यांची आक्रमणे आणि त्यांनी केलेल्या नागरिकांच्या हत्या !

‘आत्मसमर्पण’ योजनेला अल्प प्रतिसाद !

गृहविभागाने राबवलेल्या ‘आत्मसमर्पण’ योजनेच्या अंतर्गत १० वर्षांच्या कालावधीत केवळ ७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी साहाय्य करणे, त्यांना मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे अशा प्रकारे शासनाकडून साहाय्य करण्यात आले आहे.

माहितीच्या अधिकाराअंतर्गत प्राप्त झालेली माहिती :

महाराष्ट्रातील ४ जिल्हे नक्षलवादग्रस्त मुक्त, तर २ जिल्ह्यांत अजूनही आहे नक्षलवाद !

जून २०२५ मध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूर, भंडारा, नांदेड आणि यवतमाळ हे ४ जिल्हे नक्षलवादमुक्त झाल्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली आहे. गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांत मात्र अद्यापही नक्षलवाद आहे. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, गोरेगाव, सडक अर्जुनी, सालेकसा, देवरी आणि अर्जुनी मोरगाव हे तालुके नक्षलग्रस्त आहेत, तर गडचिरोली हा संपूर्ण जिल्हाच नक्षलवादग्रस्त आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च २०२६ पर्यंत भारताला नक्षलवादमुक्त करण्याचे ध्येय घेतले आहे. त्यानुषंगाने गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत नक्षली कारवायांचा कायमस्वरूपी बिमोड करण्यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागणार आहेत.