भगवान श्रीकृष्णांची भगवद्गीता, समर्थ रामदासस्वामींचा दासबोध इत्यादी ग्रंथातून ईश्वरी चैतन्य माझ्यापर्यंत पोचले आणि तेच माझे गुरु बनले ! – अनंत आठवले

पू. अनंत आठवले

‘मी गुरु का केला नाही ? अध्यात्मशास्त्राच्या अगदी आरंभीच माझे असे मत होते की, प्रत्येक गुरु आपली विचारधाराच सांगतो. माझे असेसुद्धा मत होते की, कोणत्याही व्यक्तीला संपूर्ण ज्ञान असणे शक्य नाही. खरेतर माझा कोणत्याच जिवंत असलेल्या गुरूंशी संपर्क नव्हता; पण वरील दोन मतांमुळे ‘कोणत्याही जीवित व्यक्तीला गुरु करायचे नाही’, असा माझा विचार झाला होता. जे जाणायचे, तेसुद्धा केवळ मूळ ग्रंथातूनच जाणायचे, त्या ग्रंथावर इतरांनी लिहिलेल्या पुस्तकांतून नाही, असेही मी ठरवले होते. खरेतर काय जाणायचे आहे हेसुद्धा मला तेव्हा ठाऊक नव्हते. तरीसुद्धा मनात तसे विचार का स्फुरले हे माहित नाही.

अशा प्रकारच्या विचारसरणीमुळे मी वेद, उपनिषदे, गीता, योगवासिष्ठ, ब्रह्मसूत्र, ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत, आद्य शंकराचार्र्यांचे लिखाण इत्यादी अनेक ग्रंथांचे अध्ययन केले. एक एक नवी जिज्ञासा, शंका येत गेल्या आणि ग्रंथातून वाचून त्यावर विचार करून त्यांची उत्तरे मिळत गेली. सांप्रदायिक पद्धतीने म्हणायचे, तर ईश्वराचे चैतन्य हाच माझा गुरु बनला, मी केला नाही. ते चैतन्य भगवान् श्रीकृष्णांची भगवद्गीता, समर्थ रामदासस्वामींचा दासबोध इत्यादी ग्रंथांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचून माझे गुरु बनले. अध्यात्मशास्त्रातील अनेक विषयांवर योग्य दृष्टीकोन मला रामसुखदासजी महाराज यांच्याकडून मिळाले.’

– अनंत आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू), ढवळी, फोंडा, गोवा. (१०.१०.२०२४)