८.८.२०२५ (नारळी पौर्णिमा) या दिवशी पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक (प.पू. दास महाराज यांच्या पत्नी) यांचा ७७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त प.पू. दास महाराज यांनी वर्णिलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांना ७७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. विवाहानंतरच्या आरंभीच्या काळातील व्रतस्थ जीवन
‘१८.२.१९७८ या दिवशी माई माझ्या जीवनात धर्मपत्नी म्हणून आल्या. त्या काळी घनदाट जंगलात गौतमारण्य आश्रमातील झोपडीत आम्ही रहात होतो. त्या वेळी आमची चंद्रमौळी झोपडी होती, म्हणजे रात्री चंद्राचे किरण छताच्या छिद्रांतून झोपडीत येत असत. अशा झोपडीत माईंनी माझ्या समवेत संसार थाटला. तेव्हा माझी आई घरी होती. माझ्या आईचे सोवळे पुष्कळ कडक होते. सोवळ्यात असल्याविना आईला स्पर्शही करता येत नव्हता. माईंनी ते व्रत स्वीकारून सासूबाईंची सेवा मनोभावे केली.
२. निर्भयता
पूर्वी आमच्याकडे १० म्हशी होत्या. तेच आमचे उदरनिर्वाहाचे साधन होते. म्हशीची धार काढल्यानंतर मी दूध घेऊन ४ कि.मी. अंतरावर असलेल्या बांदा शहरात जाऊन ते विकत असे. इकडे माई त्या म्हशींना चरण्यासाठी घनदाट जंगलात घेऊन जात. त्यांना जंगलात कशाची भीती वाटत नव्हती. ‘निर्भयता’ हा त्यांचा प्रधान गुण आहे.
माझ्या आईने वर्ष १९८६ मध्ये देह ठेवला. तेव्हा झोपडीत आम्ही दोघेच राहिलो. मी कामानिमित्त बांदा शहरात गेलो की, माई एकट्याच त्या जंगलातील झोपडीत असायच्या. पंचमुखी श्री हनुमत्कवच यज्ञासाठी मी अनेकदा बाहेरगावी जायचो. तेव्हासुद्धा माई निर्भयपणे झोपडीत एकट्या थांबायच्या.
३. आमची आर्थिक परिस्थिती बेताची होती. अशा स्थितीत माईंनी माझ्या समवेत झोपडीत साधारण ३० वर्षे संसार केला.
४. प.पू. गुरुदेवांच्या रूपातील श्रीरामाचे जीवनात आगमन !
त्यानंतर आम्ही वनात राहून झोपडीत जी साधना केली, ती फळाला आली आणि ज्या श्रीरामाची आम्ही मनोभावे सेवा केली, तोच श्रीराम म्हणजे प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आमच्या जीवनात आले.
५. कठीण प्रसंगात स्थिर रहाणे
वर्ष २००७ मध्ये झालेल्या एका भीषण अपघातात माझा डाव्या पायाचा अस्थिभंग झाला. या अपघातात प.पू. गुरुदेवांनी मला पुनर्जन्म दिला. त्या कठीण प्रसंगातही माई स्थिर होत्या.
६. प.पू. दास महाराज यांना साधनेत मोलाची साथ देणे
‘हिंदु राष्ट्र-स्थापनेत वाईट शक्तींच्या त्रासापासून साधकांचे रक्षण व्हावे आणि या कार्याला गती मिळावी’, यासाठी वर्ष २०१६ – २०१७ हे एक वर्ष मी मौनसाधना करावी’, अशी आज्ञा मला माझे गुरु प.प. श्रीधरस्वामी यांनी स्वप्नात येऊन केली होती. या साधनेसाठी माईंनी मला पुष्कळ साथ दिली. या वर्षभरात सगळी व्यावहारिक बाजू माईंनी सांभाळली. हिंदु राष्ट्र-स्थापनेत माईंनी उचललेला हा खारीचा वाटा होता. त्यांच्यामुळे मला मौनसाधना करता आली. वर्ष २०२० मध्ये मला प.पू. गुरुदेवांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्य करण्याची संधी दिली. मी २ वर्षे रामनाथी आश्रमात होतो. तेव्हापासून गौतमारण्यातील सर्व व्यावहारिक बाजू पू. माई सांभाळत आहेत. तेव्हा त्या प्रत्येक गोष्ट मला विचारूनच करत होत्या.
७. प.पू. दास महाराज यांची सेवा आनंदाने करणे
कालांतराने प्रकृती ठीक नसल्याने मला पुन्हा गौतमारण्य आश्रमात यावे लागले. सध्या मी तिथेच आहे. वृद्धापकाळामुळे मला वेगवेगळी औषधे घ्यावी लागतात. माई कुठलेही गार्हाणे न करता अथवा चिडचिड न करता माझी सेवा आनंदाने करतात.
८. ‘कितीही खडतर परिस्थिती असली, तरी ती आनंदाने स्वीकारणे’, हा त्यांचा गुण कौतुकास्पद आहे.
९. माईंमध्ये असलेल्या विविध गुणांमुळे प.पू. गुरुदेवांनी त्यांना बहीण मानले आहे.
अशा प्रकारे ‘प.पू. गुरुदेवांच्या बहिणीची माझ्या साधनेत मला साथ मिळाली’, याबद्दल मी प.पू. गुरुदेव आणि पू. माई यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– प.पू. दास महाराज (पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांचे पती), गौतमारण्य आश्रम, पानवळ-बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग. (१.८.२०२५)
| वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |
शाळेत मुलांना हिंदु धर्म न शिकवल्याचे दुष्परिणाम
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
साधकांनो, आपत्काळातील मार्गदर्शक म्हणून ‘सनातन प्रभात’मधील साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शन संग्रही ठेवा !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !