रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू !

अंबरनाथ – आनंदनगर एम्.आय.डी.सी. सायंकाळी कामावरून परतत असतांना वैशाली सुनील धोत्रे (वय ४५ वर्षे) या कानात ‘हेडफोन’ लावून रेल्वे रूळ ओलांडत होत्या. समोरून लोकल येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही, तसेच लोकलच्या हॉर्नचा आवाज त्यांना ऐकू आला नाही. तेथून जाणारे दादू आंबेरकर (वय ३० वर्षे) यांनीही वैशाली यांना आवाज देऊन सतर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु कानात ‘हेडफोन’ असल्याने त्याचा उपयोग झाला नाही. लोकलजवळ आल्यावर दादू यांनी वैशाली यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी लोकलची धडक दोघांनाही बसली. रुग्णालयात नेले असता दोघांनाही मृत घोषित करण्यात आले. लोहमार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. (रेल्वे रूळ ओलांडणे हा अपराध आहे, हे माहिती असूनही नागरिकांना त्याची जाणीव का नाही ? याविषयीचे गांभीर्य निर्माण करण्यात प्रशासन अपयशी ठरले असेच म्हणावे लागेल ! – संपादक)