
थायलंड येथील एक मोठे प्रकरण सध्या गाजत आहे. ते म्हणजे तेथील एका वासनाकांडात अधिक संख्येने बौद्ध भिक्खूंना एका महिलेने अडकवून त्यांच्याकडून जवळपास १०८ कोटी रुपये उकळण्याचे ! या महिलेने हे सर्व पैसे ऑनलाईन जुगारासाठी वापरले आहेत. हा एक नवीनच प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेने भिक्खूंना भुरळ घालत त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवून त्यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ सिद्ध केले अन् त्या आधारे तिने या भिक्खूंकडून कोट्यवधी रुपये खंडणी म्हणून गोळा केले. या महिलेकडून एकूण ८० सहस्र छायाचित्रे आणि व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत. यातून या वासनाकांडाची व्याप्ती किती मोठी आहे, हे लक्षात येते. या वासनाकांडात अडकलेल्या १० भिक्खूंनी भिक्खूत्व सोडले आहे. सर्वप्रथम बँकॉक येथील एका प्रसिद्ध मठाच्या मठाधिपतीने भिक्खूत्व सोडल्यावर या प्रकरणाचा थोडाफार सुगावा लागला. त्यानंतर अन्वेषण यंत्रणांची चक्रे फिरू लागली आणि नंतर अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा होत गेला. अलीकडच्या काही वर्षांत आग्नेय आशियाई देशातील भिक्खू अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सहभागी असल्याचे आढळले आहे. अमली पदार्थांच्या सहभागात आढळलेल्या भिक्खूंना अटकही करण्यात आली आहे. अश्लील गोष्टींमध्ये भिक्खू अडकल्याच्या घटनेमुळे थायलंडमधील बौद्ध समुदायाला मोठा धक्का बसला आहे.

थाई येथील भिक्खूंना ब्रह्मचारी रहाणे आणि स्त्रीचा स्पर्श टाळणे बंधनकारक आहे. संबंधित महिलेने त्यांना भूलवून अडकवले असले, तरी हाच भाग जर हिंदु संतांविषयी झाला असता, तर एव्हाना आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा केवढा मोठा गदारोळ झाला असता. त्याविषयी चर्चासत्रे, ऑनलाईन मोहिमा, आंतरराष्ट्रीय आणि देशातीलही वर्तमानपत्रांमध्ये लेख, अग्रलेख इत्यादी बरेच काही झाले असते; मात्र हिंदूंच्या व्यतिरिक्त अन्य कुणी धर्माेपदेशक असतात, तेव्हा मात्र त्याकडे हेतूपुरस्सर कानाडोळा केला जातो किंवा ‘असे काही घडलेच नाही’, असा आविर्भाव आणला जातो. त्यामुळे ‘अन्य धर्मियांमध्ये काही गैरप्रकार होतच नाहीत आणि हिंदूच तेवढे अपराधी’, असे चित्र निर्माण केले जाते, म्हणजे सोयीस्करपणे हिंदु धर्मियांच्या श्रद्धास्थानांना लक्ष्य केले जाते. यातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदु धर्म आणि संत-महंत यांची मानहानी करण्याचे मोठे षड्यंत्रच चालू असते, हे लक्षात येते. कन्याकुमारीतील एका पाद्र्याने अनेक महिलांशी संबंध ठेवल्याचे उघडकीस आले होते. त्याविषयी एक बातमी प्रसिद्ध झाली आणि त्यापुढे तो विषय माध्यमांमध्ये आलाच नाही. कुणाचीही अपकीर्ती अयोग्यच आहे; मात्र हिंदु सोडून अन्य धर्मियांमधील अशा अपप्रकारांची नोंद का घेतली जात नाही ? हा खरा प्रश्न आहे.
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !
संपादकीय : दैवी स्वरसाज हरपला !
संपादकीय : ‘गांधीवादा’ची कात टाकलेला भारत !
संपादकीय : चीनची आण्विक सिद्धता !
संपादकीय : ने मजसी ने…!
संपादकीय : तृणमूल काँग्रेसचा देशद्रोह !