Himachal Pradesh Flood : अतीवृष्टीमुळे हिमाचल प्रदेशमध्ये १५० घरे कोसळली, ६३ लोकांचा मृत्यू !

शिमला – अतीवृष्टीमुळे हिमाचल प्रदेशमध्ये १५० घरे कोसळली, तर ६३ लोकांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशने ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची मालमत्ता गमावली आहे. हवामान विभागाने ७ जुलै २०२५ पर्यंत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

१. मंडी जिल्ह्यातील थुनाग सर्वाधिक प्रभावित आहे. येथील रस्ते बंद आहेत. वीज आणि पाणी यांचा पुरवठा देखील थांबला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापनाने हानी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

२. पीडितांसाठी साहाय्यता शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत. हवाईदलाकडून अन्नाची पाकिटे पुरवण्यात येत आहेत.

३. पुरात १६४ गुरेही ठार झाली आहेत. एकूण ४०२ लोकांना वाचवण्यात यश आले आहे.

४. शिमलामध्येही भूस्खलन झाले आहे. सुदैवाने तेथे कोणतीही जीवितहानी झाली नाही.