भिवंडी येथे शिधावाटपात काळाबाजार

तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद !

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे – भिवंडी येथील रांजनोली भागात शिधापत्रिकाधारकांना वाटप केले जाणारे अन्नधान्य योग्य पद्धतीने वितरित होण्याऐवजी ते काळा बाजारात विकण्यासाठी जात होते. या प्रकरणी दुकानदार पियुश ठक्कर, रमेश भानुशाली आणि ट्रकचालक रविकिशन सिंग यांच्या विरोधात कोनगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (कायद्याचे भय वाटत नसल्याने गुन्हेगार असे गुन्हे करण्याचे धाडस करत आहेत. आरोपींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय, असे प्रकार थांबणार नाहीत ! – संपादक) ट्रकमध्ये १ लाख ४९ सहस्र रुपये किमतीचे अन्नधान्य आढळून आले आहे. पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.

संपादकीय भूमिका

शिधावाटप दुकानातील काळ्या बाजाराला भ्रष्ट प्रशासनही तेवढेच उत्तरदायी आहे ! अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शिधावाटप दुकानांवर नियंत्रण ठेवणे, परवाने देणे, आणि वितरण प्रणाली पारदर्शक ठेवणे हे या विभागाचे कार्य आहे. असे असतांना अशा घटना कशा घडतात ?