१९ दिवसांत मुंबई रेल्वे पोलिसांच्या हद्दीत १०० प्रवाशांचा मृत्यू !

  • रेल्वेस्थानकावर वैद्यकीय सुविधा देण्याचे आदेश रेल्वेकडून बासनात !

  • रेल्वे प्रवाशांचे हाल कधी थांबणार ?

मुंबई – धावत्या लोकलगाडीतून पडून २७ जून या दिवशी एका तरुणाचा मृत्यू झाला. मागील १९ दिवसांत मुंबई रेल्वे पोलिसांच्या हद्दीत १०० प्रवाशांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला आहे. ९ जून या दिवशी मुंब्रा येथे सकाळी झालेल्या अपघातात ५ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर ७ जण गंभीर घायाळ झाले. विशेष म्हणजे त्याच दिवशी विविध रेल्वे स्थानकांच्या हद्दीत आणखी ८ प्रवाशांचाही मृत्यू झाला होता. २७ जून या दिवशी मृत झालेला तरुण उपचाराविना बराच वेळ पडून होता.

प्रत्यक्षात अपघातानंतरचा लगेच जो कालावधी असतो (‘गोल्डन अवर’) त्या काळात प्रवाशावर तातडीने वैद्यकीय उपचार देण्याचे रेल्वे प्रशासनाने मान्य केले होते. तसे काहीही या तरुणाच्या संदर्भात झाले नाही.

एक दशकापूर्वी दिव्यांग समीर झवेरी यांनी रेल्वे अपघात झाल्यावर लगेच उपचार मिळण्याच्या संदर्भात जनहित याचिका केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने प्रत्येक रेल्वे स्थानकात आपत्कालीन वैद्यकीय कक्ष स्थापन करण्याचे आणि घायाळांचा जीव वाचवण्यासाठी ‘गोल्डन अवर’चे पालन करण्याचे आणि स्थानिक रुग्णालयांशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले होते.

प्रवाशांवर उपचार करण्याच्या नावाखाली प्रवासी तिकिटात ‘गोल्डन अवर सेस’ हा अधिभार लावण्याचा अजब प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने मांडला होता. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यावर रेल्वेने ते रहित केले. अद्यापही आता ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि अन्य अनेक स्थानकांतील आपत्कालीन वैद्यकीय कक्ष बंदच आहेत.