अखंड भारताच्या निर्मितीसाठीच्या कार्यक्रमावरून काँग्रेसला पोटदुखी !

  • कुंदापूर (कर्नाटक) येथील घटना

  • काँग्रेसच्या तक्रारीवरून पोलिसांनी आयोजकांना बजावली नोटीस !

  • चक्रवर्ती सुलीबेले यांचे होणार भाषण !

प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेते चक्रवर्ती सुलीबेले

मंगळुरू (कर्नाटक) – येथे २० ते २२ जून या कालावधीत प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेते चक्रवर्ती सुलीबेले यांच्या ‘इनिगा अखंड भारत निर्मिसिये विश्रांति’, म्हणजेच ‘आता अखंड भारताची निर्मिती करूनच विश्रांती घेऊ’ नावाच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावरून कार्यक्रमाच्या आयोजकांना कुंदापूर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यात ‘कार्यक्रमाचे तपशील आगाऊ द्यावेत’, ‘कार्यक्रमाला उपस्थित रहाणार्‍या मान्यवरांची आणि व्यासपिठावर उपस्थित असणार्‍यांची माहिती द्यावी’, ‘कोणत्याही धर्माला दुखावेल किंवा राजकीय नेत्यांचा अवमान होईल’, असे व्याख्यान देऊ नये, तसेच ‘उपस्थितांची संख्या आणि पार्किंग व्यवस्थेविषयी माहिती द्यावी’, अशी माहिती मागवली आहे. कोणत्याही कायद्याचे उल्लंघन झाल्यास आयोजकच पूर्णपणे उत्तरदायी असतील, अशी चेतावणीही या नोटिसीद्वारे देण्यात आली आहे. काँग्रेसने सुलीबेले यांच्या कार्यक्रमावर आक्षेप घेत तक्रार नोंदवल्यावरून पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. (सत्ताधारी काँग्रेसच्या ताटाखालील मांजर म्हणजेच कर्नाटक पोलीस  आहेत, असे कुणाला वाटल्यास त्यात चूक काय ? – संपादक)

कुंदापूर पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांना दिलेली नोटीस

कुंदापूर विभागाचे काँग्रेस समितीचे अध्यक्ष हरिप्रसाद शेट्टी यांनी पोलिसांना पत्र लिहिले आहे. सुलीबेले यांच्यावर द्वेषपूर्ण भाषण केल्याचे आरोप आहेत. त्यांच्या भाषणांनी धर्मांमधील सलोखा बिघडल्यावरून राज्याच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी करण्यात आल्या आहेत. यामुळे या कार्यक्रमाची चौकशी करावी आणि व्याख्यानात जातीयवादी भाषणाद्वारे कुंदापूरच्या परिसरात सलोखा बिघडणार नाही, याची योग्य ती काळजी घ्यावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मला अघोषितपणे हद्दपार करण्याचा हा प्रयत्न ! – चक्रवर्ती सुलीबेले

या नोटिसीला प्रत्युत्तर देतांना चक्रवर्ती सुलीबेले म्हटले की, ‘भडकाऊ भाषण करू नये’, असे मला अनेक वेळा सांगण्यात आले आहे; पण या वेळी ‘राजकीय विषयांवर बोलू नये’ आणि ‘कोणत्याही नेत्याचा अवमान करू नये’, हेही (काँग्रेसच्या) मागणीत जोडले आहे. याचा अर्थ नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याविषयी बोलू नये ? कि महमूद गझनी, महमंद घोरी, औरंगजेब यांसारख्या क्रूर शासकांचा अवमान करू नये ?

संपादकीय भूमिका

अखंड भारताऐवजी भारताचे तुकडे करण्यासाठी कार्यरत असलेल्या जिहादी आणि खलिस्तानी शक्तींच्या कार्यक्रमावरून काँग्रेसला कधीच अजीर्ण होत नाही. ‘ब्रेकिंग इंडिया फोर्सेस’, म्हणजेच भारताचे विभाजन करणार्‍यांमध्ये काँग्रेस आघाडीवर असल्यानेच असे होत रहाणार, असे कुणाला वाटल्यात त्यात चूक काय ?