शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे रूपेश राऊळ यांनी व्यक्त केली भीती

सावंतवाडी – दोडामार्ग तालुक्यात वन्यप्राण्यांनी आतापर्यंत शेती आणि बागायती यांची लाखो रुपयांची हानी केली आहे. सातत्याने होणार्या प्रचंड हानीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. हानीच्या तुलनेत सरकारकडून मिळणारी भरपाई अत्यंत तूटपुंजी असून ती मिळवण्यासाठी शेतकर्यांना सरकारी कार्यालयात हेलपाटे घालावे लागत आहेत. ही समस्या रोखण्यासाठी उपाययोजना न केल्यास भविष्यात येथील बागायतदार आणि शेतकरी यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी भीती शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी वन, कृषी आणि ग्रामविकास खात्याने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. (पश्चिम महाराष्ट्रात विविध कारणांमुळे शेतकर्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. असे असूनही कोकणातील शेतकर्याने कितीही हानी झाली, तरी अद्यापही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले नाही. त्यामुळे सरकारनेही कोकणातील शेतकर्यांच्या सोशीकतेचा अंत न पहाता तातडीने त्यांना भेडसावणार्या समस्यांवर उपाययोजना कराव्यात ! – संपादक)
‘दोडामार्ग तालुका घनदाट जंगलाने वेढलेला असून येथे वन्यजीवांचा मोठा अधिवास आहे. भात, नाचणी, नागली, केळी, नारळ, सुपारी, तसेच विविध फळझाडे ही येथील मुख्य पिके आहेत. त्यासह बांबू आणि नागली या पिकांपासूनही शेतकर्यांना वार्षिक उत्पन्न मिळते; मात्र सध्या वन्यप्राण्यांमुळे या पिकांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. माकड आणि शेकरू यांच्यापासून होणार्या हानीची भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला; मात्र १० वर्षांहून अधिक काळ लोटला तरी, त्याची कार्यवाही होत नाही. प्रत्येक शेतकर्यांची २ ते ४ लाख रुपयांची सरासरी हानी होत असल्याने त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
उत्पन्नात घट झाल्याने भविष्याची चिंता वाढली आहे. अनेकदा शेकडो माकडे थेट शेतकर्यांच्या बागायतीत घुसून हानी करतात. वन्यप्राण्यांकडून केल्या जाणार्या आक्रमणांमध्येही वाढ झाली असली तरी, प्रशासनाकडे तक्रार करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याची शेतकर्यांची खंत आहे. यामुळे काही शेतकर्यांनी शेती करणेच सोडून दिले आहे’, असे राऊळ यांनी सांगितले.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !