‘बालभारती’ने हिंदी पाठ्यपुस्तकांची छपाई केली नाही !

बालभारतीने हिंदी विषयाची पाठ्यपुस्तकांची छपाई केल्याचे वृत्त चुकीचे

पुणे – ‘बालभारती’ने इयत्ता पहिलीच्या इंग्रजी आणि मराठी माध्यमांतील विद्यार्थिसाठी सक्तीच्या हिंदी विषयाच्या पाठ्यपुस्तकांची छपाई केल्याचे वृत्त विविध माध्यमांतून प्रसिद्ध करण्यात आले होते. हे वृत्त चुकीचे आहे. याविषयी शासन आदेशांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्टीकरण ‘बालभारती’चे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.

‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ नुसार राज्यात इयत्ता पहिलीपासून नव्या अभ्यासक्रमाची कार्यवाही करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या १५ एप्रिल २०२५ या दिवशीच्या शासन निर्णयानुसार इयत्ता पहिलीपासून इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या सर्व  विद्यार्थिनीना हिंदी विषय अनिवार्य  करण्याचे निर्देश दिले होते.

या निर्णयाच्या विरोधात विविध राजकीय संघटना आणि अन्य घटक यांनी केलेल्या विरोधानंतर शासन निर्णयामधील हिंदी सक्तीविषयी तिसर्‍या भाषेसंबंधी स्थगिती घोषित करण्यात आली होती; परंतु तिसर्‍या भाषेला स्थगिती देण्याच्या घोषणेचा शासन निर्णय अद्यापही प्रसिद्ध झालेला नाही. त्यामुळे हिंदीच्या पाठ्यपुस्तकांची छपाई ‘बालभारती’ने केल्याची चर्चा शिक्षणक्षेत्रात चालू होती. या पार्श्वभूमीवर ‘बालभारती’चे संचालक पाटील यांनी हे पत्रक प्रसिद्ध केले आहे.