आळंदीच्या सिद्धबेट परिसरात मद्याच्या बाटल्यांचा खच !

स्वच्छता मोहिमेतून प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड !

आळंदी (जिल्हा पुणे) – येथील सिद्धबेट परिसर ऋषिमुनींच्या तपश्चर्येचे स्थान असल्याने भाविक मोठ्या श्रद्धेने या स्थळाला भेट देतात; मात्र अनेक पर्यटक आणि स्थानिक नागरिक येथे प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या आणि इतर कचरा फेकतांना दिसतात. नुकत्याच झालेल्या स्वच्छता मोहिमेत मोठ्या प्रमाणात मद्याच्या रिकाम्या बाटल्या सापडल्याने ‘या परिसरात मद्यपान केले जाते’, असे लक्षात येत आहे. सिद्धबेटसारख्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक स्थळाचा अयोग्य वापर थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करून येथे कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि भाविक करत आहेत. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई का करत नाही ? – संपादक)

काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायत आणि नगरपालिकेच्या वतीने या परिसरात स्वच्छता आणि सुरक्षा राखण्यासाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती केली होती. त्यामुळे काही काळ मद्यपींवर नियंत्रण आले होते; मात्र सध्या त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.