पाकिस्तान मंदिरे, कॉन्व्हेंट शाळा अशा धार्मिक स्थळांना करत आहे लक्ष्य !

  • भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेतून दिली माहिती

  • नागरी विमानतळांना बनवली ढाल !

  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बैठकीत भारत मांडणार भूमिका

(डावीकडून) भारतीय वायूदलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि सैन्याच्या कर्नल सोफिया कुरेशी

नवी देहली – जम्मू-काश्मीरमधील पूंछ क्षेत्रातील गुरुद्वारावर पाकिस्तानने आक्रमण केले. तसेच येथील एका ख्रिस्ती शाळेजवळही तोफगोळे डागले. यात २ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अन्य एका ख्रिस्ती कॉन्व्हेंटवरही आक्रमण करण्यात आले. सुदैवाने शाळा बंद असल्याने तेथील लोक बचावले. पाकने कॉन्व्हेंट शाळा आणि मंदिरे अशा धार्मिक क्षेत्रांना लक्ष्य करून त्याची पत दाखवून दिली आहे, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी ९ मेच्या सायंकाळी परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिली.

मिस्री पुढे म्हणाले की,

१. पाककडून प्रक्षोभक, दायित्वशून्य आणि वाढती आक्रमणे केली जात आहेत. तसेच खोटी माहिती प्रसृत केली जात आहे. ‘भारतीय हवाई दलानेच अमृतसरवर आक्रमण केले’, असा खोटा आरोप करून जगाला चुकीची माहिती दिली जात आहे.

२. भारताने दक्षता म्हणून करतारपूर साहिब कॉरिडोर बंद केला आहे.

३. ७ मेच्या सकाळपासून पाककडून मोठ्या प्रमाणात गोळीबार केला जात आहे.

४. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसमवेत होणार्‍या बैठकीत भारत त्याची (पाकिस्तानचा चेहरा उघडा पाडणारी) भूमिका मांडणार आहे.

५. परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी अमेरिका आणि नॉर्वे येथील परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली असून अमेरिकेने आतंकवादाच्या विरुद्धच्या युद्धात तो भारतासमवेत असल्याचे आश्‍वासन दिले आहे.

पाक मुद्दामहून नागरी विमानतळ बंद न करता त्यांना ढाल बनवत आहे ! – सैन्य

पाकिस्तानकडून सातत्याने नियंत्रण रेषेवर गोळीबार केला जात आहे. यात काही भारतीय सैनिक घायाळ झाले. भारतानेही त्यास चोख प्रत्युत्तर दिले. भारताने पाकच्या ४ हवाई तळांवर आक्रमण केले. पाकने मुद्दामहून नागरी विमानतळ बंद न करता त्यांना ढाल बनवले आहे. भारतीय वायूदल संयत रूपाने पराक्रम गाजवत आहे, अशी माहिती सैन्याच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि भारतीय वायूदलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

संपादकीय भूमिका

‘आतंकवादाला धर्म असतो आणि तो इस्लाम आहे’, हे यातून स्पष्ट होते. पाकच्या सैनिकी कारवाईच्या या प्रकारावर आता काँग्रेस आणि कथित धर्मनिरपेक्षतावादी पक्षांना जाब विचारला पाहिजे !