Amrullah Saleh On Operation Sindoor : भारताने पाकच्या गळ्यात फास घातला असून तो आवळला जात आहे !

अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांचे विधान

अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह

काबुल (अफगाणिस्तान) – भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेली प्रत्युत्तराची कारवाई धाडसी, अभूतपूर्व आणि त्याच्या वचनानुसार होती. त्याने पाकिस्तानच्या गळ्यात एक लांब फास बांधला आहे. त्या फासात ९ गाठी आहेत, ज्या तो एक एक करून घट्ट करत आहे. सध्या भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पहिला फास आवळला आहे, अशी प्रतिक्रिया अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी भारताच्या पाकवरील कारवाईवर व्यक्त केली आहे.

‘एक्स’वर पोस्टमध्ये अमरुल्ला सालेह म्हणाले की, पाकिस्तानने याला ‘भ्याड आक्रमण’ म्हटले आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेली सैनिकी कारवाई भ्याडपणापेक्षा पूर्णपणे वेगळी होती. ते एक धाडसी आणि स्पष्ट आक्रमण होते. मोठी गोष्ट म्हणजे ज्या महिला सैन्याधिकारीने या ऑपरेशनची माहिती दिली ती कुरैश जमातीतील आहे. कुरैश ही सौदी अरेबियातील एक जमात आहे, जी महंमद पैगंबर यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते.

कोण आहेत अमरुल्ला सालेह ?

अमरुल्ला सालेह हे अफगाणिस्तानचे ताजिक वंशाचे नेते आहेत. अशरफ गनी राष्ट्रपती असतांना ते अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती होते. ते तालिबान आणि पाकिस्तान यांचे कट्टर विरोधक आहेत. जेव्हा पाकिस्तानच्या प्रेरणेने तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता कह्यात घेतली, तेव्हा त्यांनी प्राण वाचवण्यासाठी देश सोडला आणि शेजारच्या ताजिकिस्तानमध्ये आश्रय घेतला. ते अफगाणिस्तानच्या विनाशासाठी पाकिस्तानला उत्तरदायी ठरवतात आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने त्यासाठी पाकिस्तानला शिक्षा करावी, अशी मागणी करत आहेत.