अमरावती येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’निमित्त पत्रकार परिषद !

अमरावती – मी सनातन संस्थेशी मागील ४ – ५ वर्षांपासून जोडलेलो आहे. संस्थेच्या आध्यात्मिक कार्याविषयी लक्षात आल्यावर मी त्यात सक्रियपणे सहभागी झालो. सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला जाण्याची मलाही संधी मिळाली आहे. या महोत्सवाची निमंत्रणपत्रिका पाहिल्यावर त्याद्वारे सनातन राष्ट्राची मुहूर्तमेढ होणार आहे. ‘सनातन राष्ट्र’ संकल्पनेला आध्यात्मिक शक्ती मिळणार आहे. हा महोत्सव म्हणजे अनेक संतांचे मार्गदर्शन, नामजप, यज्ञ, संत परिषद असा आध्यात्मिक स्तरावरचा असल्यामुळे यातून सनातन संस्थेचे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य समाजाला कळणार आहे, असे विधान महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य कोअर कमिटीचे पदाधिकारी श्री. अनुप जयस्वाल यांनी केले. शंखनाद महोत्सवानिमित्त येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर, सनातन संस्थेच्या साधिका सौ. संगीता जाधव, श्रीमती विभा चौधरी, हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. नीलेश टवलारे उपस्थित होते.
या महोत्सवाला अमरावती येथून श्री रुक्मिणी विदर्भ पीठाचे जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी राजेश्वर माऊली सरकार, शिवधारा आश्रमाचे प.पू. डॉ. संतोष देवजी महाराज, योग वेदांत सेवा समितीचे श्री. मानव बुद्धदेव उपस्थित रहाणार आहेत.