
माणगाव (रायगड) – तालुक्यातील पन्हळघर धरणाचे पाणी मिळू शकत नसल्याने येथील १२८ गावे आणि वाड्या यांना टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवावे लागत आहे. गावातील आदिवासी आणि नागरिक यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. २-३ कि.मी. चालत जावे लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गापासून ५ कि.मी.वर ही गावे आहेत. कामधंदे सोडून पाण्याच्या मागे त्यांना फिरावे लागत आहे. त्यामुळे त्यांचा रोजगारही बुडत आहे. धरणाला लागून वस्ती असूनही त्यांना धरणाचे पाणी मिळत नाही, अशी स्थिती आहे. येथील धरणाने पाणी अडवलेल्या आणि पूर्ण आटलेल्या नदीत खड्डा करून आदिवासी पाणी भरतात. गावाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापिठात पुरेसे पाणी येते, याविषयीही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अलिबाग, तसेच पेण तालुक्यातील खारेपाट भागातही तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे