तळवडे : ‘मधाचे गाव’ साठी निवड

राजापूर – महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रत्येक जिल्ह्यात एक मधाचे गाव’ या योजनेनुसार राजापूर तालुक्यातील तळवडे या गावाची ‘मधाचे गाव’ साठी निवड झाली आहे. पितांबरी कंपनी सुगंधी समृद्ध कोकण विकास मंच, ग्रामपंचायत तळवडे आणि खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.

या संदर्भातील सर्व आवश्यक ठराव ग्रामपंचायत आणि शासन स्तरांवर संमत झालेले आहेत. नुकतेच तळवडे येथे ‘पितांबरी उद्योग समूहा’च्या सभागृहात ५ दिवसांचे ‘मधुमक्षिका पालन प्रशिक्षण’ही प्रशिक्षक हेमंत डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यामध्ये मधमाशांची प्राथमिक ओळख, विविध प्रजाती, महत्त्व, मधमाशांची कार्यप्रणाली, त्यांचे खाद्य, संगोपन, उपचार यांसारख्या अनेक गोष्टी प्रात्यक्षिकांसह शिकवण्यात आल्या. परिसरातील अनेकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.


तत्पूर्वी पितांबरी उद्योग समूहाचे श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या चमूने गावात प्रायोगिक तत्त्वावर २० मधमाशांच्या पेट्या आणून त्यांद्वारे मध संकलनाचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. खादी व ग्रामोद्योगचे विविध अधिकारीही गावात येऊन ‘येथील वनसंपदेच्या आधारे गावात चांगल्या प्रकारे मधमाशी पालन होऊ शकते’ या गोष्टीला दुजोरा दिला. मधाचे गाव उभारणीसाठी शासनाचे ५४ लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध आहे. यातून प्रशिक्षण, मधमाशीच्या पेट्या, विविध पायाभूत सोयींची उभारणी यांसारख्या गोष्टी करता येऊ शकतात.

खादी व ग्रामोद्योगचे सभापती रवींद्र साठे यांचाही तळवडे दौरा निश्चित झाला असून लवकरच ते तळवडे गावाला भेट देऊन इतर सोपस्कार पूर्ण होतील. ‘मधाचे गाव’ या प्रकल्पामुळे गावाला नवीन ओळख तर मिळेलच आणि त्यासमवेत गावात मधूक्रांती होऊन आर्थिक उत्पन्नाचे नवे पर्याय ग्रामस्थांना उपलब्ध होणार आहेत.