मुंबई पोलिसांच्या उपलब्ध आकडेवारीनुसार वर्ष २०२२ पासून आतापर्यंत कर्तव्यावर असतांना ३७९ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. ३७९ पैकी ३३४ पोलिसांचा नैसर्गिक, तर २३ जणांचा अपघाती मृत्यू आणि २२ जणांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकार्यांखेरीज मुंबई विद्यापिठातील समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनीही पुढे येऊन यातील प्रत्येक घटनेच्या पार्श्वभूमीची अन् कारणांची चिकित्सा करणे आवश्यक आहे. अशाच घटना महाराष्ट्रातील इतर भागांतही सतत होत असतात.
१. पोलिसांचे कर्तव्य, त्यात होणारा राजकीय हस्तक्षेप आणि त्यातून होणारे खच्चीकरण
देशात कायदा आणि सुव्यवस्था चांगली रहावी, शांतता असावी अन् त्यातून जनसामान्यांना स्वतःचा, तसेच राष्ट्राचा विकास करता यावा, या उद्देशाने शासनाने पोलीसदलाची निर्मिती केली आहे; परंतु प्रत्येक समाजात अनेक कारणांमुळे गुन्हे करणारे, समाजामध्ये धर्म, जात, प्रांत, भाषा, लिंग अशा अनेक कारणांनी असंतोष निर्माण करणारे, दंगली घडवून आणणारे अन् त्यातून स्वतःचा राजकीय स्वार्थ पूर्ण करणारे अनेक जण असतात. अशा या समाजविघातक, राष्ट्रद्रोही व्यक्तींचा समाजातील सामान्य नागरिक फारसा विरोध करू शकत नाहीत. त्यांना संघटितपणे, कायद्याच्या आधारे, त्यांनी सभ्यपणाचा घातलेला बुरखा दूर करून न्यायालयापुढे सादर करणारे आणि त्यांना न्यायालयाच्या माध्यमातून शिक्षा करणारे पोलीसदल आवश्यक आहे अन् ते पोलिसांचे आद्यकर्तव्य आहे. असे असले, तरी पोलिसांच्या कामामध्ये ढवळाढवळ करणे, गुन्हेगार आणि समाजविरोधक यांना पकडू न देणे, पकडले असल्यास त्यांना सोडायला लावणे, गुन्हेगारांना कायद्यातील पळवाटा शोधून शिक्षा होऊ न देणे, यांसाठी समाजातील अनेक घटक हे हिरिरीने प्रयत्न करतांना दिसतात. पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करणे, त्यांनी केलेल्या कर्तव्यामुळे त्यांना निलंबित करणे, त्यांना पदोन्नती मिळू न देणे, यांसाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. स्वतःची मनमानी चालू ठेवता यावी, यासाठी स्वतःच्या हातचे बाहुले बनून वागणार्या पोलीस अधिकार्यांना स्वतः जवळच्या पोलीस ठाण्याच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यासाठी स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणणार्या अनेक व्यक्ती काम करत असतात. आपण केलेल्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष व्हावे आणि स्वतःच्या राजकीय विरोधकांना कायद्याच्या माध्यमातून त्रास देता यावा, यांसाठी या पोलीस अधिकार्यांचा वापर केला जातो. स्वत:च्या मनाविरुद्ध आणि कायद्याप्रमाणे वागणार्या अधिकार्यांना वेळोवेळी पालटून त्यांचे अकार्यकारी वा कमी महत्त्वाच्या पद़ांवर तडकाफडकी स्थानांतर केले जाते. पोलिसांचा पाणउतारा करण्यासाठी स्थानांतर वा निलंबन ही दोन शस्त्रे प्रामुख्याने पाजळली जातात. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनीही ‘सर्व कर्मचारी हे आपले सहकारी आहेत’, असेच त्यांच्याशी वर्तन ठेवणे आवश्यक आहे. थोड्याशा कारणाने त्यांना शिक्षा करणे, अपमान करणे, हे शिस्तबद्ध खात्यास लाजिरवाणे आहे.

याखेरीज समाजातील गुन्हेगार व्यक्ती वाहतुकीचे नियम पाळायला सांगणार्या पोलिसांवर आक्रमण करतात. गुन्हेगाराला पकडायला गेलेल्या पोलीस चमूवर जीवघेणे आक्रमण करून त्यांना पळवून लावले जाते वा ठार मारले जाते. अनेक गुन्हेगारांनी बेकायदेशीररीत्या जमवलेल्या पैशांतून अनेक चित्रपट काढले आहेत, ज्यात पोलिसांचा पांडु हवालदार हा नेभळट, लाचखोर, लाचार अशा प्रकारे वर्णन केले जाते. या सर्व गोष्टींमुळे पोलिसांचे मानसिक खच्चीकरण व्हावे, हा उद्देश असतो.
२. पोलिसांवरील ताणतणाव न्यून करण्यासाठी काही उपाययोजना
पोलिसांना आवश्यक अशा सर्वसोयींनी युक्त सरकारी घरे निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून न देणे, असलेल्या घरांची डागडुजी न करणे यांमुळे मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या महानगरातील पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय यांना अत्यंत खराब स्थितीत जगावे लागते. प्रतिदिन १२ घंटे काम, सुट्टी मिळण्याची अल्प शक्यता यांमुळे पोलीस कर्मचार्यांचे आरोग्य धोक्यात येते आणि ते व्यसनाधीन बनतात. वेळच्या वेळी जेवण न मिळणे, शांत झोप न मिळणे, व्यायाम करायला सोयी नसणे यांचा परिणाम होऊन पोलिसांना सतत ताणतणावात दिवस काढावे लागतात.
यांवर उपाय म्हणून पोलिसांच्या कामाच्या वेळा कमी करणे, जिथे काम असेल त्या ठिकाणीच त्यांची रहाण्याची, व्यायामाची, झोपायची सोय करणे, पौष्टिक आहार परवडणार्या किमतीत उपलब्ध करणे, त्यांच्या कुटुंबियांसाठी सुरक्षित ठिकाणी आवश्यक त्या सोयींनीयुक्त घरे बांधणे आवश्यक आहे. सल्लागारांचे साहाय्य घेऊन मानसिकरीत्या दुर्बल पोलिसांना वेळोवेळी वैद्यकीय साहाय्य देणे आवश्यक आहे. कोणताही पोलीस कर्मचारी अथवा अधिकारी नेहमी समुहात राहील, याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. ‘आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाईन (दिशा) १०५६’ची माहिती प्रत्येक पोलीस ठाण्यात लावणे सक्तीचे करण्यात यावे. प्रशिक्षण काळात, तसेच वेळ मिळेल, तेव्हा रामायण, भागवत यांसारख्या ग्रंथांचे परिशीलन (अभ्यास) करण्यास आध्यात्मिक गुरूंच्या साहाय्याने प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. पूर्वी यातील गोष्टी सहज कानावर पडत असत. त्यातून फार मोठे आध्यात्मिक साहाय्य मिळत असते आणि त्यामुळे अपयशाने माणूस खचून जात नाही.
३. समाजाने ‘पोलीस मित्र’ म्हणून पोलिसांना सहकार्य करणे महत्त्वाचे !
याखेरीज पोलिसांची टिंगलटवाळी करणार्या चित्रपटांवर समाजाने सार्वजनिकरित्या बहिष्कार घालणे, पोलिसांना त्यांच्या कामात साहाय्य करण्यासाठी प्रत्येक सक्षम स्त्री-पुरुष यांनी पुढे येऊन ‘पोलीस मित्र’ म्हणून काम करणे आवश्यक आहे. गणेशोत्सव, मोहरम, नवरात्र उत्सव यांसारख्या उत्सवांसाठी पोलिसांनीही पोलीस मित्रांना प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. लोकांनीही त्यात समजूतदारपणा दाखवणे आवश्यक आहे. राजकीय नेतृत्वानेही पोलिसांच्या कायदेशीर कामामध्ये ढवळाढवळ न करणे, पोलिसांचे स्थानांतर अथवा निलंबन दबावाखाली न करणे अत्यंत आवश्यक आहे. कायदा-सुव्यवस्था राखतांना पोलिसांनी नियमाप्रमाणे कारवाई केली, तरीही त्यांना निलंबित करावे, ही मागणी कितपत योग्य आहे, याचा धर्म, जात, पक्ष यांच्या पलीकडे जाऊन विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसांनाच साहाय्य होईल, असे नव्हे, तर समाजाला आणि देशालाही जगात ‘विकसित’ बनवणे शक्य होईल.
– श्री. प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक, मुंबई. (१६.२.२०२५)