Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati : देशात मंगल पांडे यांच्यामुळे क्रांती झाली होती !

  • शंकराचार्य अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांची तिरुपती मंदिराच्या लाडूंच्या प्रकरणावर प्रतिक्रिया

  • हिंदूंसमवेत मोठा विश्‍वासघात झाल्याचे विधान

शंकराचार्य अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती

नवी देहली – तिरुपती मंदिरातील लाडूंच्या संदर्भातील घटना वादापेक्षा मोठी आहे. मंगल पांडे यांना गायीची चरबी लावलेली बंदुकीची काडतुस तोंडाद्वारे उघडायला सांगितली आणि मग त्यावरून देशात क्रांती झाली होती, अशी प्रतिक्रिया ज्योषित पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांनी ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली.

शंकराचार्य पुढे म्हणाले की, आज कोट्यवधी भारतियांच्या तोंडी गोमासांची चरबी घातली गेली. ही काही लहान घटना नाही. हा हिंदु समाजासमवेत मोठा विश्‍वासघात आहे. ४-५ दिवस उलटून गेले आहेत. या घटनेच्या अन्वेषणाला विलंब होईल; पण ही घटना विसरता येणार नाही. हा एक मोठा आणि संघटित गुन्हा आहे. याला जो कुणी उत्तरदायी असेल, त्याला समोर आणून कठोर शिक्षा झाली पाहिजे. जोपर्यंत गोमाता आहे, तोपर्यंत आपण अपवित्र होऊ शकत नाही.