वक्फ कायदा, त्यातील दुरुस्ती आणि सावळा गोंधळ !

‘जशा एका म्यानात दोन तलवारी ठेवता येत नाहीत, तसेच एका देशात एका वेळेस २ कायदे चालू शकणार नाहीत. काँग्रेसने केलेली घाण काढायची असेल, तर ती मुळासकट काढली पाहिजे. देश ‘काँग्रेसमुक्त’ करायचा होता ना ? घोडे कुठे अडले ? हिंदु विचारसरणीच्या राजकीय पक्षांना मत दिले नाही की, तो देशद्रोही ठरतो; पण ज्या राजकीय पक्षांना हिंदु विचारसरणीने चालायचे आहे, त्यांनीही धाडसाने पावले टाकली पाहिजेत ना ? आपल्यातच फोडाफोडी आणि संघर्ष. यात शहाणपण ते कसले ? तारतम्याचे भान हरवून जर राजकीय पक्ष चालणार असतील, तर ते चालू द्यायचे नाही, हे येथील जनतेने विचारात घेतले पाहिजे.

श्री. श्रीनिवास वैद्य

१. काँग्रेस म्हणजे पुळचट राजकीय नेतृत्वाचे उदाहरण नव्हे का ?

जगभर आपल्या देशाच्या संस्कृतीची प्रतीके सापडत आहेत. याचा अर्थ आपल्या देशातील धर्म, संस्कृती आणि परंपरा ही विश्वव्यापी होती. कालागणिक भारत देशाची भूमी संकुचित होत चाललेली आहे. आपला देश हा सहस्रो वर्षांच्या प्रथा परंपरांचा देश आहे. पराक्रमाचा आहे. या देशाला स्वतःचे कायदे आहेत. नियम आहेत. हे सारे नीतीमत्तेने बांधलेले आहेत. यात स्वार्थ नाही. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण पृथ्वी ही कुटुंब आहे.) ही या देशाची विचारधारा आहे. वर्ष १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले. याचा अर्थ हा देश काही नव्याने निर्माण झालेला नाही. ‘जे आमचेच होते, तेच आम्ही संघर्षाने परत मिळवले आहे’, हा त्याचा खरा अर्थ आहे. परकीय दास्यातून भारतभूमी मुक्त केलेली आहे. हा तो इतिहास आहे; पण हे सारे घडत असतांनाच काँग्रेस नामक राजकीय पक्षाने या देशात जी घाण करून ठेवलेली आहे, ती स्वच्छ करण्याचे काम प्रत्येक भारतीय नागरिकाचे आहे. यासाठी त्याला हवे आहे ते नेतृत्व. या भूमिकेतून काँग्रेस पक्षाने या देशाचे नेतृत्व कधीच केले नाही. त्यांची मुसलमानधार्जिणी भूमिका ही कधीच लपून राहिलेली नाही.

स्वातंत्र्याच्या मुहुर्ताला धर्माच्या आधारे जेव्हा या देशाचे दोन तुकडे केले गेले, तेव्हा दुसर्‍या धर्माचे आपल्या देशातील वर्चस्व संपुष्टात यावयास हवे होते. सर्वधर्मसमभावाच्या पुळचट तत्त्वाच्या आधारे या देशाची राज्यघटना केली गेली. ‘हे विश्वची माझे घर’ आणि ‘वसुधैव कुटुम्बकम्’ यामध्ये कोणते तत्त्व होते ? सर्व मानवजातीच्या कल्याणाच्या गोष्टीच यात होत्या ना ? मग हिंदु धर्मास दुय्यम स्थान देऊन ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मियांना या देशात त्यांच्या त्यांच्या धर्माचा प्रचार, प्रसार करण्याची मोकळीक का देण्यात आली ? अन्य धर्मियांनी हिंदु धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यास त्यांच्या त्यांच्या राष्ट्रात अनुमती दिलेली आहे, हे आम्हास कुणी सांगेल का ? हे सारे पाप काँग्रेस पक्षाचे आहे. हे त्यांच्या पुळचट राजकीय नेतृत्वाचे उदाहरण नाही का ?

२. वक्फ कायदा, हिंदु धर्म आणि इस्लाम यांची शिकवण

वक्फ कायदा इस्लाम धर्मावर आधारित आहे. अन्य धर्मियांची लुडबूड तेथे चालत नाही. एकदा एखादी मालमत्ता वक्फ म्हणून नियुक्त केली गेली की, ती अल्लाहची मालकी मानली जाते; म्हणून ती विकणे, वारसा किंवा भेट म्हणून दिली जाऊ शकत नाही. याचा अर्थ साधा, सोपा आणि सरळ असा आहे की, वक्फ बोर्डाची पूर्ण मालमत्ता ही मुसलमान धर्मियांची आहे, म्हणजे अल्लाची आहे. परत शिया आणि सुन्नी यांचे स्वतंत्र वक्फ बोर्ड आहेत, असे सांगितले जाते, म्हणजे मुसलमान धर्मियांच्या ज्या काही धर्म शाखा आहेत, त्यांनी आपापल्या धर्म विचारांना संरक्षण दिलेले आहे.

हिंदु धर्म संस्कृतीमध्ये ‘सब भूमी गोपाल की’, म्हणजेच ‘सारे काही ते ईश्वराचे आहे’, असे समजले जाते. हा ईश्वर म्हणजे विश्व नियंता आहे. तुम्ही आम्ही या भूतलावरील प्रवासी आहोत. जे निसर्गाचे आहे, ते सांभाळणे आपले काम आहे. येतांना ही भूमी जशी होती तशी किंवा त्यापेक्षा अधिक चांगली करणे एवढे आपले कर्तव्य सांगितले गेले आहे. याउलट ‘इस्लाम धर्मानुसार केवळ अन्नाला मागणार्‍या माणसांना अभय आहे. उर्वरित सारे काफिर आहेत. एक तर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला पाहिजे, नाहीतर त्यांना नष्ट केले पाहिजे’, हे त्यांचा धर्म सांगतो. आपल्या धर्मात अशी काही शिकवण आहे का ?

३. देशात एकाच वेळेस २ कायदे कसे चालतील ?

‘अतीशहाणा त्याचा बैल रिकामा’, असे म्हणतात. त्यानुसार वर्ष १९४७ नंतरच्या स्वतंत्र भारतातील शासनकर्ता हा अतीशहाणपणाच्या रस्त्यावर चाललेला आहे आणि त्याचे परिणाम आज आपण सारे भोगत आहोत. वक्फ बोर्ड ही त्या अतीशहाणपणाची निर्मिती आहे. जसे आमच्या धर्माने ‘सब भूमी गोपाल की’, हे सांगितले आहे, तसेच आमच्याच राज्यघटनेने ‘या देशातील संपूर्ण जागा ही भारतभूमीची आहे आणि राज्यघटनेने स्थापित होणार्‍या सरकारी मालकीची आहे’, असेच सांगायला हवे होते ना ? ‘या भूमींचे नियंत्रण या देशातील कायद्यानुसारच चालणार’, असे स्पष्ट प्रावधान (तरतूद) या राज्यघटनेत असायला हवे होते. मग आपल्या देशातील भूमीला एकाच वेळेस २ कायदे लागू होत आहेत. हे कसे चालेल ?

४. देशाचे कायदे हिंदूंना संरक्षण देत नसतील तर ते लाजिरवाणे !

या देशातील कायदा जर या भूमीतील सर्वांना समानतेने लागू होत नसेल, तर त्याचा अर्थ सरळसरळ एकच आहे आणि तो, म्हणजे एकाच भूमीवर २ कायदे एकाच वेळेस कार्यरत आहेत. अशा वेळी संघर्ष अटळ आहे. प्रभु श्रीराम, भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शंकर यांची ठिकाणे आमच्या देशातील कायद्याने संरक्षित रहात नसतील, आमच्याच कायद्याने आम्हाला ती अधिकृत करता येत नसतील आणि त्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागत असेल, तर या देशातील कायदे काय कामाचे ? गेली शेकडो वर्षे अयोध्येतील रामजन्मभूमी, भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी असलेली मथुरा आणि काशीविश्वेश्वराचे मंदिर स्वतंत्र करण्यासाठी आम्ही लढत आहोत. आमच्या पिढ्यान्‌पिढ्या यात खर्ची पडलेल्या आहेत. देश आमचा (हिंदूंचा), कायदे आमचे, परंपरा आमच्या आणि हे सारे सांभाळण्यासाठी आम्ही लढायचे, तेही आमच्याच देशात ! आमचेच कायदे आम्हाला (हिंदूंना) संरक्षण देत नसतील, तर हे कसले कायदे ? हे कमी की काय, म्हणून वक्फ बोर्डसारखा कायदा या देशात ‘आमच्याच देशाच्या कायद्याच्या चौकटीत सिद्ध केला आहे’, असे सांगून लादला जातो. आम्ही तो वर्षोनुवर्षे सहन करतो. सर्व लाजिरवाणी स्थिती आहे. अयोध्येच्या श्रीराममंदिराचा लढा जिंकलो; म्हणून आम्ही जेव्हा उत्सव साजरा केला, तेव्हाच खरे तर आमची मान शरमेने खाली गेली होती. अनुमाने ५०० वर्षांचा हा लढा राजकीय तडजोडीतून सुटतो आणि ‘आमच्या देशातील कायद्याने आम्हाला न्याय दिला’, असे या प्रकरणात अभिमानाने म्हणताच आलेले नाही.

५. वक्फ कायदा म्हणजे एकाच राज्यघटनेत २ धर्म ठेवणे

या सार्‍या पार्श्वभूमीवर आम्ही वक्फ कायद्याचा विचार करत आहोत. वक्फ बोर्डाच्या संबंधित कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी सध्या सार्वत्रिक मतांची मागणी केली होती. संयुक्त संसदीय समिती समोर यावर चर्चा होणार आहे. त्यावर आम्हीही आमचे मत नोंदवले आहे. प्रचलित कायद्याने आणि संसदेत जे होणार आहे, ते होत राहील; पण प्रत्येक हिंदूने राजकीय पक्षांच्या भूमिकेच्या पावलावर पाऊल टाकण्यापेक्षा वास्तवतेचा अभ्यास केला पाहिजे. वस्तूस्थितीचे भान ठेवले पाहिजे. खरी परिस्थिती समजून घेतली पाहिजे. सध्याची देशातील एकूणच राजकीय व्यवस्था हिंदूंना न्याय देण्यास पुरेशी नाही, याची नोंद घेतली पाहिजे. मताचे वारे फिरेल, तशी ही राजकीय व्यवस्था फिरणारी आहे. एका म्यानात दोन तलवारी ठेवता येत नाहीत, हे आपणास समजते; पण एकाच राज्यघटनेत २ धर्म ठेवले गेलेले आहेत, हे विसरून चालणार नाही. आपल्याला हवे असलेले अधिकार आणि देश सुरक्षित ठेवणे यांसाठी लढण्यास आपण सदैव सज्ज असले पाहिजे. भविष्यात संघर्ष अटळ आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

श्री गजाननाला आमची एवढीच कळकळीची प्रार्थना, ‘सर्व हिंदूंना आवश्यक असणारी इच्छाशक्ती दे, त्यासाठी आम्हास बळ दे. हे कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी तू लक्ष घाल. वक्फ बोर्ड आणि त्या कायद्यातील दुरुस्ती हा सारा सावळा गोंधळ आहे. यातून हिंदु धर्म, संस्कृती आणि भूमी यांना न्याय मिळेल याकडे लक्ष दे.’

– श्री. श्रीनिवास माधवराव वैद्य, सनदी लेखापाल, सोलापूर.

(श्री. श्रीनिवास वैद्य यांच्या फेसबुकवरून साभार)