शरद पवार यांच्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला जातीयवादाचा कर्करोग झाला आहे ! – पडळकर

मुंबई – शरद पवार यांच्यामुळे राज्याच्या पुरोगामी तोंडावळ्याला जातीयवादाचा कर्करोग झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेली तेजाची झळाळी शरद पवार यांच्यामुळे हरवली आहे. गेल्या ५०-६० वर्षांत शरद पवार यांनी महाराष्ट्राला केवळ लुटण्याचे काम केले आहे. पवारांचा शासनकाळ हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी पाने आहेत. आता महाराष्ट्राला सर्वसमावेशक तोंडावळा मिळाला असून तो पालटून पवारांना पुन्हा महाराष्ट्रावर सरंजामी लादायची आहे का ? असा प्रश्न भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे.

गोपीचंद पडळकर पुढे म्हणतात, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांना जो अपेक्षित असा महाराष्ट्र होता, जो महाराष्ट्र १८ पगड जाती आणि १२ बलुतेदारांचा होता, तो शरद पवार यांनी ५० वर्षे स्वत:च्या खासगी आस्थापना म्हणून वापरला. शरद पवार यांनी भ्रष्टाचार, जातीवाद करून लोकांमध्ये भांडण लावली. त्यामुळे मला त्यांना विनंती करायची आहे की, निवांत रहा आणि हरिनामाचा जप करा म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये चांगले काम करण्याची इच्छा जागृत होईल.’’