अनेक वेळा तक्रारी करूनही अनधिकृत मदरशावर प्रशासनाने कारवाई न केल्यामुळे ग्रामस्थांचे पुन्हा १५ ऑगस्टला उपोषण

धोपेश्वर पन्हळे (ता. राजापूर) येथील अनधिकृत मदरशाचे प्रकरण

प्रतिकात्मक छायाचित्र

राजापूर – गेली २ वर्षे शहरालगतच्या धोपेश्वर ग्रामपंचायतीच्या हद्दीत पन्हळे तर्फे राजापूर या गावामध्ये चालू असलेला अनधिकृत मदरसा बंद करावा, असा ठराव ग्रामसभेमध्ये पारित झाला आहे. याविषयी ग्रामपंचायत, महसूल आणि पोलीस प्रशासन यांच्याकडे सातत्याने तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने धोपेश्वर पन्हळे येथील ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाची चेतावणी दिली आहे. याविषयीचे निवेदन धोपेश्वर पन्हळे येथील ग्रामस्थ अमोल सोगम यांनी प्रशासनाला दिले आहे.

या अगोदर या मदरशाविरोधात येथील ग्रामस्थांनी २६ जानेवारी २०२४ या दिवशी ग्रामपंचायत धोपेश्वर कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. या वेळी तहसीलदार सौ. शीतल जाधव यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना ‘२९ फेब्रुवारीपर्यंत या विषयावर निर्णय दिला जाईल’, असे आश्वासनही दिले होते, त्यामुळे ग्रामस्थांनी उपोषण स्थगित केले होते; मात्र प्रशासनाने अद्यापही ही कारवाई न केल्यामुळे ग्रामस्थांना पुन्हा उपोषण करावे लागत आहे.

धोपेश्वर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये एका शेतघरामध्ये ग्रामपंचायत अथवा शासनाची कोणतीही अनुमती न घेता मदरसा चालू करण्यात आला आहे. या मदरशामध्ये परराज्यातील मुले रहात असून त्यांचा गावात स्वैराचार चालू झाल्याने ग्रामस्थांनी याविषयी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती.

संपादकीय भूमिका 

  • अनधिकृत मदरसा बंद करण्यास अनेक वेळा तक्रारी कराव्या लागणे आणि त्यासाठी ग्रामस्थांना उपोषण करावे लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद ! या घटनेतून  ‘धोपेश्वर भारतात आहे कि पाकिस्तानात ?’ असा प्रश्न कुणाला न पडला तर नवल !
  • अनधिकृत मदरसा प्रशासनाला दिसला कसा नाही ? कि तेथे कोणतीही अनुचित घटना घटना घडल्यानंतर प्रशासनाने अनधिकृत म्हणून तो बुलडोझरने पाडण्यासाठी अद्याप शिल्लक ठेवला आहे ?