वादग्रस्त लेखिका अरुंधती रॉय हिच्याविरुद्ध गुन्हा नोंद होणार !

  • १४ वर्षांपूर्वी चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप !

  • फुटीरतावाद्यांच्या परिषदेत केले होते चिथावणीखोर भाषण !

वादग्रस्त लेखिका अरुंधती रॉय

नवी देहली – १४ वर्षांपूर्वी ‘काश्मीर भारताचा अविभाज्य भाग नाही’, असा कुप्रचार करणार्‍या एका परिषदेत चिथावणीखोर भाषण दिल्याच्या प्रकरणी वादग्रस्त लेखिका अरुंधती रॉय हिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यास देहलीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी मान्यता दिली. रॉय हिच्यासह ‘काश्मीर केंद्रीय विद्यापिठातील आंतरराष्ट्रीय कायद्याचे माजी प्राध्यापक डॉ. शेख शौकत हुसेन याच्याविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात येणार आहे.

देहलीतील कोपर्निकस रोड येथील एल्.टी.जी. ऑडिटोरियम येथे २१ ऑक्टोबर २०१० ‘आझादी – द ओन्ली वे’ (स्वातंत्र्य – एकच मार्ग) नावाची परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अरुंधती रॉय आणि प्रा. शौकत हुसेन यांनी चिथावणीखोर भाषणे केली होती. काश्मीरमध्ये तीव्र अशांततेच्या काळात ही परिषद झाली. त्या कालावधीत फुटीरतावादी निदर्शने करत असतांना पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्यामुळे तुफेल अहमद मट्टू नावाच्या १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे काश्मीर खोर्‍यात तीव्र निदर्शने झाली होती.

सामाजिक कार्यकर्ते श्री. सुशील पंडित यांनी वर्ष २०१० मध्ये प्रविष्ट (दाखल) केली होती तक्रार !

रॉय आणि हुसेन यांच्या चिथावणीखोर भाषणांच्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते श्री. सुशील पंडित यांनी २७ नोव्हेंबर २०१० या दिवशी रॉय आणि हुसेन यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. यानंतर महानगर दंडाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानंतर देहली पोलिसांनी रॉय आणि हुसेन यांच्या विरोधात ‘एफ्.आय.आर्.’ प्रविष्ट (दाखल) केली. या तक्रारीत तक्रारदार श्री. सुशील पंडित यांनी म्हटले होते की, या परिषदेत अरुंधती रॉय यांच्यासह इतर अनेक वक्त्यांनी चिथावणी भाषणे करून सार्वजनिक शांतता आणि सुरक्षा धोक्यात आणली आणि ‘काश्मीर भारतापासून वेगळे करा’, या फुटीरतावादी विचारसरणीचा प्रचार केला.’ यासह श्री. पंडित यांनी या परिषदेचे ध्वनीमुद्रण न्यायालयासमोर सादर केले. या आधारावर न्यायालयाने देहली पोलिसांना अरुंधती रॉय आणि शौकत हुसेन यांच्या विरोधात ‘एफ्.आय.आर्. प्रविष्ट करण्याचा आदेश दिला होता.

संपादकीय भूमिका

  • केवळ गुन्हा नोंद करायला १४ वर्षे घेणारे पोलीस आरोपींना शिक्षा करायला किती वर्षे घेतील ?, याचा विचारच न केलेला बरा ! यास उत्तरदायी असलेल्या पोलिसांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे !
  • निष्पाप हिंदुत्वनिष्ठांविरुद्ध स्वतःहून गुन्हे नोंदवणारे पोलीस देशद्रोही विधाने करणार्‍यांविरुद्ध स्वतःहून साधी तक्रारही करत नाहीत, हे लक्षात घ्या !