ठेवी परत मिळण्यासाठी अर्ज करण्याचे ‘रूपी बँके’चे ठेवीदारांना आवाहन !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – रूपी सहकारी बँकेच्या ठेवीदार किंवा खातेदारांना ५ लाख रुपयांपर्यंतच्या त्यांच्या ठेवी परत मिळणार आहेत. त्यासाठी संबंधित शाखेशी संपर्क करून आवश्यक कागदपत्रे बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये सादर करण्याचे आवाहन बँकेने केले आहे. रूपी बँक ही १ नोव्हेंबर २०२२ पासून अवसायनात आली. अवसायनाच्या प्रक्रियेअन्वये ठेव विमा महामंडळाच्या वतीने यापूर्वी बँकेकडून ५ लाख रुपयांपर्यंतची वीमा संरक्षित ठेव रक्कम मिळाली नाही, अशा ठेवीदारांना संबंधित शाखेमध्ये अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले आहे. बँकेने आतापर्यंत ७९६ कोटी २० लाख  रुपयांच्या ठेव रकमा परत केल्या आहेत. ठेवी परत मिळण्यासाठी अर्ज न केलेल्या ठेवीदारांनी संबंधित शाखेशी त्वरित संपर्क करावा आणि आवश्यक कागदपत्रांसह त्यांचे अर्ज बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये द्यावेत, असे आवाहन बँकेने केले आहे.