Amit Shah On Naxal Problem : पुढील २-३ वर्षांत नक्षलवाद संपुष्टात येईल !

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य !

  • ३० सप्टेंबरपूर्वी काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

नवी देहली – येत्या २-३ वर्षांत देशातून नक्षलवाद्यांची समस्या पूर्णपणे संपुष्टात येईल, असे आश्‍वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहे. ते पुढे म्हणाले की, एकेकाळी काही लोक पशुपतीनाथ ते तिरुपती याला ‘नक्षल कॉरिडॉर’ संबोधत होते. आता झारखंड राज्य पूर्णपणे नक्षलमुक्त झाले आहे. बिहार, ओडिशा, तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश ही राज्येही पूर्णपणे नक्षलमुक्त आहेत. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश हेही नक्षलवादमुक्त झाले आहेत. ५ महिन्यांपूर्वी छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार आल्यापासून राज्याला नक्षलवाद्यांपासून मुक्त करण्याचे काम चालू झाले आहे. येत्या २-३ वर्षांत ही समस्या देशातून पूर्णपणे संपुष्टात येईल. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.

गृहमंत्री शहा पुढे म्हणाले की,

१. जम्मू-काश्मीरमध्ये ३० सप्टेंबरपूर्वी विधानसभेच्या निवडणुका होतील. आमच्या सरकारने दिलेल्या आश्‍वासनानुसार निवडणुकीनंतर केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा दिला जाईल.

२. जम्मू-काश्मीरमध्ये यशस्वी मतदानाने मोदी सरकारचे काश्मीर धोरण योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे.

३. आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये सीमांकन प्रक्रिया पूर्ण केली आहे; कारण सीमांकन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आरक्षण दिले जाऊ शकते. डिसेंबर २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला जम्मू-काश्मीरमध्ये ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसारच विधानसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण करू.

४. येत्या ५ वर्षांत देशात समान नागरी संहिता लागू करण्यात येणार आहे.

५. देशात सर्व निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातील.