अयोध्येवर नैसर्गिक संकटे येत नव्हती ! – श्रीमान गौरांगप्रिय प्रभुजी

अहिल्यानगर येथील इस्कॉन मंदिरात श्रीराम कथा महोत्सव

अहिल्यानगर – प्रभु श्रीराम प्रगट होण्यापूर्वीही अयोध्यानगरी सुरक्षित होती. सूक्ष्म तत्त्वांचेही संरक्षण या नगरीत होत होते. कोणतेही नैसर्गिक संकट अयोध्येवर येत नव्हते. या नगरीत घराला कुलपे नसायची; कारण चोरी होतच नव्हती. आज एका घरात रहाणार्‍या चार जणांच्या भ्रमणभाषसंचालाही कुलूप (पासवर्ड) असते. ज्या घरात कुणाच्याही भ्रमणभाषला कुलूप नसते, ते घर अयोध्या होय, असे श्रीमान गौरांगप्रिय प्रभुजी यांनी सांगितले. येथील पाईपलाइन रोडवरील कादंबरीनगरीत इस्कॉन मंदिरात चालू असलेल्या श्रीराम कथा महोत्सवाचे द्वितीय पुष्प गुंफतांना ते बोलत होते. व्यासपिठासमोर इस्कॉन मंदिराचे व्यवस्थापक श्रीगिरीवरधारी प्रभुजी यांच्यासह स्त्री-पुरुष भक्तगण मोठ्या संख्येने विराजमान झालेले होते. लहान मुलांचीही लक्षणीय उपस्थिती होती.

श्रीमान गौरांगप्रिय प्रभुजी पुढे म्हणाले की, रामायण उत्तम भक्तांची, भक्तांच्या तपश्चर्येची कथा आहे. सीतामाई, लक्ष्मण, हनुमान, जटायू, बिभिषण, शबरी आदी उत्तम भक्तांची श्रद्धा आणि उत्तम भावना रामायणातील कथांमधून समोर येते. रामायणात भक्तांच्या समर्पणाच्या कथा आहेत. त्यागाच्या परिसीमा असलेल्या कथा आहेत. या अद्भुत भक्तांच्या कथा ऐकतांना हृदयात भक्तीभाव उत्पन्न होतात. भक्तांच्या सद्गुणांच्या कथा ऐकतांना नातेसंबंध कसे असावेत ? कसे जपावेत ? हे कळते.

अयोध्येमध्ये येऊन लव आणि कुश जेव्हा रामायण गाऊ लागले, तेव्हा स्वतः प्रभु श्रीराम स्वत:चे सिंहासन सोडून त्यांच्याजवळ येऊन बसले. कथा ऐकण्याचा आनंद सर्वाधिक असतो, तसेच कथा श्रवण करतांना त्यात रममाण कसे व्हावे ? हे श्रीरामांनी स्वत:च्या कृतीमधून दाखवून दिले.

वैदिक सनातन समाजात चरित्र आणि शिष्टाचार यांमुळे व्यक्ती उत्तम मानली जाते. व्यक्तीकडे किती ज्ञान आहे ? यापेक्षा तिने स्वत:च्या ज्ञानामधून परिवर्तन किती केले ? हे महत्त्वाचे मानले जाते. ‘फ्लॅट संस्कृती’त रहाणारे स्वत:च्या कुटुंबापुरताच- फ्लॅट पुरताच विचार करतात. संपूर्ण इमारतीचा विचार करणे चालू झाले की, समाजाचा विचार करणे चालू होते. यामधून सेवाभाव जागृत होतो. हा सेवाभाव निरपेक्ष असला की, अंतःकरणात कोमल भावना प्रगट होवून भगवंताकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त होतो. भगवंताचे गुणगाण गातांना भगवंतस्वरूप झाल्याचा शाश्वत आनंद मिळवता येतो. याकरिता श्रद्धा आणि विश्वास दृढ असणे आवश्यक ठरते.