छत्तीसगड राज्यात प्रसार करतांना गुरुमाऊलीच्या कृपेमुळे आलेले अनुभव आणि धर्मप्रेमींचा कार्याबद्दलचा भाव !

१. समितीच्या कार्यासाठी स्वतःचे घर आणि गाडीही वापरण्यास देणारे रायपूर येथील धर्मप्रेमी श्री. परवेश तिवारी !

‘रायपूर येथील धर्मप्रेमी श्री. परवेश तिवारी मागील वर्षीच्या अधिवेशनात आल्यानंतर कार्य बघून अत्यंत प्रभावित झाले. त्यानंतर रायपूर येथे परत आल्यावर त्यांनी स्वतःच्या घराचा वरचा मजला जो आधी त्यांनी भाड्याने दिला होता, ते घर रिकामे झाल्यावर ‘यापुढे हे घर केवळ हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसाठीच राहील’, असे सांगितले. ते आम्हाला नेहमी म्हणतात की, ‘तुम्ही रायपूरलाच रहायला या. इथून आपल्याला सहजतेने प्रसार करता येईल.’ त्यानंतर त्यांनी सांगितले, ‘‘ही चारचाकी गाडी आपलीच आहे’, असे समजून वापरत जा.’’ या वेळी अधिवेशनाला निमंत्रण देतांना त्यांनी ‘आता आम्ही नवीन नाही. आम्हाला केवळ ऐकायला नाही, तर सेवा द्या. आता मी हिंदु जनजागृती समितीचा सेवक आहे’, असे ते म्हणतात.

श्री. निरज क्षीरसागर

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणारे रायपूर येथील दुसरे धर्माभिमानी श्री. मदन मोहन उपाध्याय (सनदी लेखापाल, सी.ए.) !

२ अ. सासर्‍यांच्या निधनानंतरच्या तेराव्या दिवशीही समितीचे कार्य सर्वांना सांगणे : रायपूर येथील दुसरे धर्माभिमानी श्री. मदन मोहन उपाध्याय हे अधिवेशनाला आले होते. तेसुद्धा समितीचे कार्य बघून प्रभावित झाले आणि प्रत्येक ठिकाणी ते समितीचे धर्मप्रसाराचे कार्य सर्वांना सांगतात. अगदी त्यांच्या सासर्‍यांच्या निधनानंतरचा तेरावा दिवस असतांनाही त्यांनी सगळ्यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने होणार्‍या धर्मप्रसाराच्या कार्याबद्दल सांगितले. ‘हिंदु राष्ट्रासाठी खरे कार्य केवळ हिंदु जनजागृती समिती करते’, असे ते प्रत्येक ठिकाणी सांगतात.

२ आ. स्वतःची कंपनी बंद करून पूर्ण वेळ धर्मासाठी देण्याचा निर्णय घेणे : वर्ष २०२२ च्या अधिवेशनानंतर त्यांनी त्यांची कंपनी बंद करून पूर्णवेळ धर्मासाठी देण्याचा निर्णय घेतला. त्यांचा धर्मप्रसाराच्या कार्यात सक्रीय सहभाग असतो. रायपूर येथे ‘हिंदू सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित परिसंवाद’ याच्या आयोजनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांचा गुरुदेवांप्रती भाव आहे. त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त केलेल्या मार्गदर्शनात सांगितले, ‘एखाद्या भिकार्‍याला अकस्मात् एखाद्या करोडपती माणसाने दत्तक घ्यावे आणि तो एका रात्रीत करोडपती व्हावा’, तसे आमचे झाले आहे. त्यांच्यातील भावामुळे त्यांच्या पत्नीलाही आश्रम आणि गुरुदेवांच्या भेटीची ओढ लागली आहे.

अधिवेशनाला आल्यापासून वरील दोन्ही धर्माभिमान्यांची सक्रीयता वाढलेली आहे.’

– श्री. निरज क्षीरसागर, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, छत्तीसगड