रत्नागिरी-सिंधुदुर्ग  मतदारसंघात महायुतीच लढणार ! – उपमुख्यमंत्री फडणवीस

रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर कोठडी नूतनीकरण कामाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमीपूजन

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला आहे. या मतदारसंघात महायुतीच लढणार आहे. तिथे महायुतीचा उमेदवार जिंकून येणार आहे. त्याचे चिन्हही महायुतीचे असेल.’’
विकासकामाविषयी फडणवीस काय म्हणाले, ‘‘नवीन पोलीस निवासस्थाने करत आहोत. नवी जिल्हाधिकारी कार्यालय करत आहोत. ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना २ वर्षे ज्या कारागृहात ठेवण्यात आले होते. ते पुष्कळ जुने झाले आहे. जी कोठडी आहे, तिथे अनेक जण प्रेरणा घेण्यासाठी येतात. तेथेही सुशोभिकरण करायचे आहे. इतिहासाचं जतन करण्यास आम्ही प्रारंभ केला आहे.’’

रत्नागिरी, १४ मार्च – येथील विशेष कारागृहातील स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर कोठडीचे सुशोभिकरण आणि बंदींसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नूतनीकरण अन् मजबुतीकरण कामाचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करून करण्यात आले.

८ कोटी २४ लाख रुपयांच्या निधीमधून ही कामे होणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष कारागृहातील स्वा.वि.दा. सावरकर यांच्या कोठडीला भेट दिली. या ठिकाणच्या स्वा.वि.दा. सावरकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वंदन केले. नंतर त्यांच्या छायाचित्र दालन आणि हस्तलिखिताची पहाणी केली.

या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार योगेश कदम यांनी पुष्प वाहून वंदन केले. या वेळी कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि अन्य शासकीय अधिकारी उपस्थित होते.

नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन

येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधण्यात येणार्‍या नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुदळ मारून आणि कोनशिला अनावरण केले. या नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत ९२ कोटी खर्च अपेक्षित आहे.