TN Recovered TempleProperty : तमिळनाडूच्या धर्मादाय विभागाने मंदिरांची ५ सहस्र ७०० कोटी रुपयांची मालमत्ता अतिक्रमणकर्त्यांकडून परत मिळवली !

चेन्नई – तमिळनाडूच्या धर्मादाय विभागाने वर्ष २०२१ पासून ५ सहस्र ७०० कोटी रुपयांच्या विविध मंदिरांच्या मालकीच्या भूमी, भूखंड आणि इमारती अतिक्रमण करणार्‍यांकडून परत मिळवल्या आहेत. तमिळनाडू सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार राज्यभरातील ६ सहस्र ७१ एकर भूमी अतिक्रमणकर्त्यांकडून परत मिळवण्यात आली आहे आणि ती मूळ मालकीहक्क असलेल्या मंदिरांकडे सुपुर्द करण्यात आली आहे.

मंदिरांच्या भूमीचा ‘डिजिटल डाटा’ बनवणार !

अतिक्रमणकर्त्यांकडून परत मिळवलेली भूमी किंवा मालमत्ता यांच्या भोवती कुंपण घालण्यात येणार असून मंदिरांची मालकी दर्शवणारे फलक लावण्यात येणार आहेत, असे धर्मादाय विभागाचे मंत्री पी. के. सेकरबाबू यांनी सांगितले. सेकरबाबू म्हणाले की, धर्मादाय विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या मंदिरांच्या मालकीच्या एकूण ४ लाख ७८ सहस्र एकर भूमीपैकी १ लाख ६७  एकर भूमीचा ‘डिजिटल भूमी संसाधन डेटाबेस’ सिद्ध करण्यात आला आहे.

धर्मादाय विभाग विसर्जित करण्याची भाजपची मागणी

वर्ष २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘ईशा फाऊंडेशन’चे सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी ‘तमिळनाडूतील मंदिरे मुक्त करा’ अशी मोहीम चालू केली होती. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी धर्मादाय विभाग रहित करण्याचे आश्‍वासन दिले आहे. धर्मादाय विभागाची ही मोहीम ही मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांची राजकीय चाल आहे. द्रमुक पक्षावर ‘हिंदुविरोधी’ असल्याचा आरोप केला जातो.

संपादकीय भूमिका 

मुळात मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण होईपर्यंत द्रमुक सरकार झोपले होते का ?