Rajasthan Police Suspended : जयपूर (राजस्थान) येथे उघडपणे गोमांस बाजार चालू देणारे ४ पोलीस निलंबित !

पोलीस महानिरीक्षकांकडून कडक कारवाई

जयपूर (राजस्थान) – जयपूर विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांनी गावोगावी दिवसाढवळ्या चालणारे गोमांस बाजार आणि गोहत्या करणारी पशूवधगृहे यांच्या विरोधात कडक कारवाई केली आहे. पोलीस महानिरीक्षक उमेशचंद्र दत्ता यांनी आधी परिसराची पहाणी केली आणि नंतर निष्काळजीपणा करणार्‍या त्यांच्याच पोलीस विभागावर मोठी कारवाई केली. किशनगढबास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश मीणा यांच्यासह ३८ पोलिसांना निष्पक्ष अन्वेषणासाठी तैनात केले होते. या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर साहाय्यक पोलीस उपनिरक्षक ज्ञानचंद, मुख्य हवालदार रघुवीर, हवालदार स्वयंप्रकाश आणि रविकांत या ४ पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचे अन्वेषण कोतपुतली बेहरोर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक नेमीचंद यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. (अवैध गोहत्या रोखण्यासाठी कठोर पावले उचलणार्‍या पोलीस महानिरीक्षक उमेशचंद्र दत्ता यांचे अभिनंदन ! – संपादक)

१. अलवर जिल्ह्यातील खैरथल आणि मेवात परिसरात उघडपणे गोमांस बाजारचे  आयोजन आणि सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे ‘होम डिलिव्हरी’ करण्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस सतर्क झाले आहेत.

२. पोलीस महानिरीक्षक उमेशचंद्र दत्ता यांनी किशनगढबास आणि रामगढ परिसरामध्ये अवैध गोहत्या होणार्‍या ठिकाणांवर धाडी घातल्या.

३. पोलिसांनी घटनास्थळांवरून १२ दुचाकी आणि एक पिकअप वाहन जप्त केले. यासह खोर्‍यातून गुरेही जप्त करण्यात आली आहेत.

४. पोलीस महानिरीक्षक उमेशचंद्र दत्ता यांनी सांगितले, ‘मी स्वत: ४ जिल्ह्यांतील पोलीस अधीक्षकांसह शोधमोहीम राबवली.’

५. बलरामपूर आणि रुंध येथील गावांमध्ये गोमांस बाजारात मोठा व्यवसाय केला जात होता. प्रतिदिन २० हून अधिक गायींची हत्या केली जात होती.

संपादकीय भूमिका

राजस्थानमध्ये भाजपचे सरकार आल्याने पोलीस अधिकारी कामाला लागले आहेत. काँग्रेसचे राज्य असतांना राजस्थानमध्ये अशा प्रकारे किती हिंदूविरोधी कारवाया चालू असतील, याचा विचारही न केलेला बरा !