शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांच्या विधानाचा विपर्यास करून अशांतता निर्माण केल्यास त्याच भाषेत उत्तर दिले जाईल ! – सकल हिंदु समाज

कोल्हापूर – करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी पुणे येथे केलेल्या प्रवचनाविषयी शहरातील काही स्वयंघोषित पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष धूमकेतू अकारण वाद निर्माण करत आहेत. जे लोक धर्म मानत नाहीत, त्यांनी अकारण राजकीय हेतूने अशा घटनांमध्ये लुडबूड करू नये. शंकराचार्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात कुठेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही. त्यामुळे त्यांनी क्षमा मागण्याचा प्रश्नच येत नाही. पुरो(अधो)गामी लोकांनी हिंदु धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या शंकराचार्यांच्या मठावर मोर्चा, निदर्शने यांची भाषा करू नये. विनाकारण समाजात वादविवाद निर्माण करून अशांतता निर्माण केल्यास सकल हिंदु समाजाच्या वतीने त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आले.

या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, जयवंत निर्मळ, नंदू घोरपडे, राजू तोरस्कर, बजरंग दलाचे श्री. विशाल पाटील, संभाजी साळुंखे यांसह अन्य उपस्थित होते. ‘कोल्हापूर येथील कायदा-सुव्यवस्था बिघडवणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी’, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.