अल्पवयीन हिंदु युवतींचे धर्मांतर करणारे ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन केंद्र’ बंद करा ! – हिंदू एकता आंदोलन

मिरज येथे आंदोलन करणारे हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते

मिरज – पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव येथील ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन केंद्रा’ने जुलै २०२२ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत २ हिंदु अनुसूचित जमातीतील अल्पवयीन मुलींना शिक्षणाचे आमीष दाखवून त्यांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केले. या मुलींना ‘येशूचे रक्त आहे’, असे सांगून ‘वाईन’ प्यायला दिली. याला विरोध केल्यानंतर त्यांना सार्वजनिक स्वच्छतागृहे स्वच्छ करायला लावणे यांसह अन्य अत्याचार करण्यास प्रारंभ केला. या मुलीच्या नातेवाइकांनी मुलींना भेटण्याचा प्रयत्न केला असता त्यांना भेटू दिले नाही. तरी अल्पवयीन हिंदु युवतींचे धर्मांतर करणारे पंडिता रमाबाई मुक्ती मिशन केंद्र बंद करावे, या मागणीसाठी पू. ईश्वरबुवा रामदासी यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने मिरज येथे आंदोलन करण्यात आले.

हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, या हिंदु मुलींना ‘तुमचे हिंदु देवी-देवता मेले आहेत; म्हणून त्यांना हळदीकुंकू लावतात’ असे त्यांना सांगू लागले, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ज्या वेळेस या मुली नातेवाइकांना भेटल्या, तेव्हा त्या दोन्ही मुलींच्या हाताला त्या संस्थेची शौचालये धुऊन जंतूसंसर्ग झाला होता. संस्थेची ही कृत्ये समजताच नातेवाइक पोलीस ठाण्यात गेले. नंतर पोलिसांनी पंडिता रमाबाई मुक्ती मिशन केंद्रावर गुन्हा नोंद केला. तरी राज्य सरकारने ही संस्था तात्काळ बंद करून, या संस्थेचे सर्व आर्थिक व्यवहार पडताळावेत. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात सेवेच्या नावाखाली ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. त्यासाठी महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा लागू करावा.

या प्रसंगी हिंदू एकता आंदोलनाच्या शोभा आवळे, रंजना आवळे, मंगल कोळेकर, सर्वश्री परशुराम चोरगे, दत्ता भोकरे, संजय जाधव, विष्णुपंत पाटील, सोमनाथ गोटखिंडे, राजू जाधव, प्रकाश कोळेकर, अभिमन्यू भोसले, तसेच अन्य हिंदू उपस्थित होते.

संपादकीय भूमिका :

अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते लक्षात येत नाही का ?