‘एम्.आय.डी.सी.’च्या वतीने पुढील ५ वर्षे १० लाख रुपये मराठी संत साहित्य संमेलनासाठी देणार !- पालकमंत्री उदय सामंत

१२ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी – वारकरी साहित्य परिषद आयोजित अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनासाठी पुढची ५ वर्षे १० लाख रुपये, तसेच पुढील १० वर्षे १५ लाख रुपये दिले जातील. तसा ठराव ‘एम्.आय.डी.सी.’च्या  बैठकीत केला जाईल, अशी घोषणा करतांनाच पुढील वर्षीही रत्नागिरी येथेच संत साहित्य संमेलन घ्यावे, अशी भूमिका पालकमंत्री उदय सामंत यांनी मांडली.
येथील स्वयंवर मंगल कार्यालयात १२ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांनी ५ फेब्रु्रवारीला केले. या वेळी संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील, ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, ह.भ.प. मनोहर महाराज आवटी, राजेश ओसवाल, नीलेश महाराज, देवीदास महाराज, श्रीमंत शितोळे सरकार आदी उपस्थित होते.

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, ‘‘वारकर्‍यांच्या पदस्पर्शाने आज रत्नागिरीची भूमी पावन झाली आहे. जातीय भेद नष्ट करणे, संत साहित्याची परंपरा पुढे चालू ठेवणे, खर्‍या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे काम वारकर्‍यांकडून होत आहे. वारकरी संप्रदायाला राजश्रय मिळाला पाहिजे. संप्रदायाच्या महंतांशी चर्चा करून लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली जाईल. तुमची भूमिका निश्चितच राज्याकडे मांडू. त्यात कुठेही मागे पडणार नाही.’’


संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर म्हणाले की, वारकरी संप्रदायाचा विचार  ज्याने ज्याने घेतला, तो जगात नावारूपाला आला. ते विचार जपले पाहिजेत, भक्त पुंडलिकाप्रमाणे आई-बापांची सेवा मुलांनी केली पाहिजे. हा संस्कार अशा संमेलनातून देऊन निरोगी समाजमन बनण्यास उपयुक्त ठरेल.

क्षणचित्रे :

१. ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्यलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

२. ह.भ.प. पांडुरंग महाराज राशीनकर यांच्या हस्ते ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर यांच्याकडे वीणा प्रदान करण्यात आली.

३. प्रास्ताविकात ह.भ.प. विठ्ठल पाटील काकाजी यांनी सविस्तर आढावा सांगितला.

४. शेवटी ह.भ.प. चैतन्य महाराज कबीरबुवा यांनी आभार प्रदर्शन केले.

५. पसायदानाने संमेलनाच्या उद्घाटन सत्राची समारोप करण्यात आला. या सत्राचे पूर्वा पेठे यांनी सूत्रसंचालन केले.