तेंगिनगुंडी गावातील (कर्नाटक) पंचायतीने स्वातंत्र्यवीर सावरकर नावाचा वृत्तफलक आणि भगवा ध्वज काढला !

गावकर्‍यांचे आंदोलन

कारवार (कर्नाटक) – भटकळ तालुक्यातील तेंगिनगुंडी गावातील समुद्रकिनारी असलेला ‘सावरकर वृत्त’ नावाचा फलक आणि भगवा ध्वज पंचायत विकास अधिकार्‍यांनी काढला. याविषयी ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. भाजपचे नेते, तसेच ग्रामपंचायत सदस्य गोविंद नायक आणि सुब्राय देवाडिगा यांच्या नेतृत्वाखाली गावकर्‍यांनी आंदोलन छेडले आहे. नामफलक लावण्यास सरकारची अनुमती होती. ग्रामपंचायतीने अचानक ‘जेसीबी’द्वारे हे दोन्ही काढले.

पंचायत विकास अधिकार्‍यांना जाब विचारतांना गोविंद नायक म्हणाले की, ‘कुणाच्या बापाची मालमत्ता म्हणून तो ध्वज आणि फलक काढण्यात आला ? हे पाकिस्तान आहे; म्हणून काढला का ? हिंदु गप्प बसणार नाहीत. तुमच्यावर कुणाचा दबाव आहे का ? हे भटकळ आहे. कुणाच्या तरी हातातील बाहुले बनून राहू नका’, अशा शब्दांत त्यांनी खडसावले.

संपादकीय भूमिका 

कर्नाटकात टिपू सुलतानचे वंशज असल्याप्रमाणे वागणार्‍या काँग्रेसचे सरकारच्या काळात अशा घटना प्रतिदिन घडत आहेत आणि असे सरकार असेपर्यंत घडत रहाणार आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी सरकार पालटले पाहिजे !