मानवाधिकार हा भारतीय संस्कृतीचा गाभा ! – आरिफ महंमद खान, राज्यपाल, केरळ

पुणे येथे चाणक्य मंडल परिवाराच्या वतीने पुस्तक प्रकाशन सोहळा !

केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

पुणे – जगात धर्म, भाषा, प्रांत आणि वर्णाच्या आधारे द्वेष अन् हिंसा यांची भाषा बोलली जात होती. म्हणूनच वर्ष १९४८ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाला मानवाच्या प्रतिष्ठेच्या आधारावर मानवाधिकारांचे वैश्विक घोषणापत्र स्वीकारावे लागले; पण सहस्रो वर्षांपासून सार्वभौमिक सर्वसमावेशकतेचा दृष्टीकोन अवलंबणारी भारतीय संस्कृती प्रत्येक व्यक्तीत दिव्यतेची प्रचीती अनुभवते. मानवाधिकार हा या संस्कृतीचा गाभा आहे, असे मत केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी व्यक्त केले.

बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘चाणक्य मंडल परिवारा’च्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ‘चाणक्य मंडल’चे संस्थापक माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, भूषण केळकर, पूर्णा धर्माधिकारी आदी उपस्थित होते. चाणक्य मंडलचे माजी विद्यार्थी आणि सध्या प्रशासकीय अधिकारी असलेल्या ३२ यशस्वीतांचा प्रवास मांडणारे ‘यशोगाथा’ हे पुस्तक, तसेच ‘प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास’ या पुस्तकांचे प्रकाशन या वेळी करण्यात आले.

आरिफ महंमद खान पुढे म्हणाले की, गावपातळीवर असलेली पंचायत आणि गणराज्य लोकशाही भारताला नवीन नाही. त्याची नवी प्रक्रिया आधी आत्मसात करणार्‍या देशांनी महिलांचा मताधिकार नाकारला होता. आपण मात्र स्वातंत्र्यासमवेत सर्वांना मताचा अधिकार सुनिश्चित केला. हे केवळ येथील संस्कृतीमुळे शक्य झाले. आपण आपला सांस्कृतिक वारसा जगाला समजावू शकलो नाही.