श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेवर हिंदुद्वेषी विदेशी प्रसारमाध्यमांकडून टीका

मशिदीच्या जागी मंदिर बांधल्याने मुसलमानांमध्ये भीती निर्माण झाल्याचा दावा !

अयोध्येतील श्रीराममंदिरातील श्री रामललाची मूर्ती

नवी देहली – अयोध्येत श्रीराममंदिरात श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्याचे वृत्त देशातील नव्हे, तर विदेशातील प्रसारमाध्यमांनीही प्रकाशित केले आहे. यातील काही प्रसारमाध्यमे आधीपासूनच हिंदुद्वेषी आणि भारतविरोधी असल्याने त्यांनी या घटनेच्या विरोधात वृत्ते प्रकाशित केली आहेत. या घटनेमुळे भारतातील मुसलमानांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा या वृत्तांत करण्यात आला आहे.

१. ब्रिटनच्या बीबीसी प्रसारमाध्यमाने म्हटले आहे की, भारताच्या पंतप्रधानांनी पाडलेल्या मशिदीच्या जागी मंदिराचे उद्घाटन केले. (मंदिर पाडून मशीद बांधली होती, हे बीबीसी सांगत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक) काही मुसलमानांनी आम्हाला सांगितले की, प्राणप्रतिष्ठा समारंभाने त्यांच्यासाठी वेदनादायक आठवणी परत आणल्या आहेत. (काही मुसलमानांचे म्हणणे घेतांना ‘कोट्यवधी हिंदूंना काय वाटले?’, ते बीबीसी घेत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक)

२. कतारच्या ‘अल् जझीरा’ने बातमीच्या मथळ्यात ‘मोदी यांनी केले श्रीराममंदिराचे उद्घाटन, मुसलमानांना त्यांच्या भविष्याची भीती वाढली !’ असे म्हटले आहे. अयोध्येतील एका मुसलमान महिलेचा हवाला देत लिहिले आहे, ‘मला टोमणे मारण्यात आले. मला पहाताच काही लोक ‘जय श्रीराम’च्या घोषणा देऊ लागले. त्यांच्यात आक्रमक विजयाची भावना होती.’ (अयोध्येतील अन्य मुसलमानांनी मंदिराचे समर्थन केले आहे, हे अशी जिहादी प्रसारमाध्यमे कधी सांगणार नाहीत ! – संपादक) डिसेंबर १९९२ मध्ये हिंदु राष्ट्रवादींच्या जमावाने उद्ध्वस्त केलेल्या मशिदीचा भारतीय माध्यमांमध्ये उल्लेख नाही.

३. पाकिस्तानच्या ‘डॉन न्यूज’ने लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मंदिराचे उद्घाटन केले जे हिंदु राष्ट्रवादी राजकारणाच्या विजयाचे प्रतिबिंब आहे. सोनेरी पोशाखातील मोदी यांनी श्रीरामाची मूर्ती मंदिराच्या मध्यभागी स्थापित केली. ज्या ठिकाणी शतकानुशतके जुनी मशीद उभी होती त्या जागेवर हे मंदिर बांधण्यात आले आहे. जी वर्ष१९९२ मध्ये मोदी यांच्या पक्षाच्या भडकावण्यामुळे लोकांनी पाडली. (खोटे बोला; पण रेटून बोला’ या मनोवृत्तीची पाकिस्तानी प्रसारमाध्यमे ! – संपादक)

४. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने ‘पंतप्रधान मोदी यांच्या ‘हिंदु प्रथम’ भारताचा विजय आहे’, असे म्हटले आहे. पुढे म्हटले की, भारतात हिंदूंचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट मोदी यांनी पूर्ण केले; मात्र  देशातील २० कोटी मुसलमानांमध्ये भीती निर्माण झाली आहे. (न्यूयॉर्क टाइम्स हे हिंदु आणि भारत विरोधी वर्तमानपत्र असल्याने त्याच्याकडून याहून वेगळी अपेक्षा करता येत नाही ! – संपादक) भारताच्या हिंदु उजव्या पक्षाने देशाच्या राजकारणातील एक महत्त्वाची राजकीय शक्ती बनण्यासाठी श्रीराममंदिर आंदोलन प्रारंभ केले. २ सहस्र कोटी रुपयांहून अधिक खर्च करून ७० एकरांवर बांधलेल्या श्रीराममंदिराला पंतप्रधान मोदी यांचे तिसर्‍यांदा पंतप्रधान बनवण्याकडे पाहिले जात आहे.

५. सी.एन्.एन्.ने लिहिले आहे की, भारताच्या मोदी यांनी वादग्रस्त मंदिराचे उद्घाटन केले. भारतातील लाखो लोकांनी घरी दूरदर्शनवर श्रीराममंदिराचे उद्घाटन पाहिले. या मंदिरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक प्रचाराला चालना मिळणार आहे. श्रीराममंदिर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन भारताचे स्वप्न आहे जे प्रत्यक्षात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात बाबरी किंवा मुसलमान यांचा उल्लेख केला नाही. ते म्हणाले की, हा एका नवीन काळाचा प्रारंभ आहे.

संपादकीय भूमिका

  • विदेशी आणि इस्लामी प्रसारमाध्यमांना भारत आणि हिंदु यांच्याविषयी पूर्वीपासून द्वेष असल्याने ते जाणीवपूर्वक दोघांना नेहमीच लक्ष्य करत असतात ! अशा प्रसारमाध्यमांवर भारतियांनी बहिष्कार घालण्यासह भारत सरकारने जाब विचारणेही आवश्यक आहे !