धर्म, भक्त आणि देव यांचे हित लक्षात घेऊन मंदिरांचे व्यवस्थापन पहावे !

‘मंदिर सुव्यवस्थापन’ परिसंवादामध्ये विश्‍वस्तांची भावना !

ओझर, ३ डिसेंबर (वार्ता.) – मंदिरांच्या विश्‍वस्तांनी ‘विश्‍वस्त’ ही बिरूदावली बाजूला ठेवून सर्वसामान्य भाविक म्हणून भगवंताची सेवा करायला हवी. ‘भक्त’ होऊन मंदिराचे व्यवस्थापन पाहिल्यास मंदिराची कीर्ती सर्वदूर पसरेल. धर्म, भक्त आणि देव यांचे हित लक्षात घेऊन मंदिरांचे व्यवस्थापन पहावे, असे मत ‘मंदिराचे सुव्यस्थापन’ या परिसंवादामध्ये मान्यवरांनी व्यक्त केले. महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेमध्ये २ डिसेंबर या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादामध्ये माजी धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख, अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिराचे विश्‍वस्त श्री. डिगंबर महाले, ओझर येथील विघ्नहर गणपति मंदिराचे व्यवस्थापक श्री. अशोक घेगडे, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव हे सहभागी झाले होते. हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी हा संवादाचे सूत्रसंचालन केले.

श्री. डिगंबर महाले

या वेळी श्री. डिगंबर महाले पुढे म्हणाले, ‘‘पुजारी, भाविक हे मंदिराचा आत्मा आहे.  पुजार्‍यांच्या धार्मिक वृत्तीमुळे भाविकांना दिव्यतेची अनुभूती घेता येऊ शकेल.

पुजारी किती तन्मयतेने वागतात, समजावून सांगतात, तेव्हा येणार्‍या भाविकांना दिव्य अनुभूती येते. यासाठी पुरोहितांची भूमिका महत्त्वाची आहे. विश्‍वस्तांनी अहंकार बाजूला ठेवून काम करायला हवे. पुजारी आणि विश्‍वस्त यांनी आपापसांतील वाद टाळायला हवेत. पदाचा मानसन्मान बाजूला सारून विश्‍वस्तांनी भाविकांशी नम्रतेने वागायला हवे. स्वच्छता, नम्रता आणि पारदर्शकता ही त्रिसूत्री विश्‍वस्तांनी पाळायला हवी. यामुळे मंदिरात आल्यावर भाविकांना आत्मानुभूती घेता येईल.’’

सौजन्य: Hindu Janajagruti Samiti

मंदिरात येणार्‍या भाविकांना समाधान मिळायला हवे ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सद्गुरु नंदकुमार जाधव

सद्गुरु नंदकुमार जाधव म्हणाले, ‘‘मंदिरात आत्मानुभूती घेण्यासाठी भाविक मंदिरात येतात. विश्‍वस्तांनी भाविकांचा अधिकाधिक विचार करायला हवा. उन्हाळ्याच्या काळात भाविकांच्या पायांना चटके लागू नयेत, याची काळजी विश्‍वस्तांनी घ्यायला हवी. मंदिरात येणार्‍या भाविकांना समाधान मिळायला हवे.’’

विश्‍वस्तांनी मंदिर व्यवस्थापनाविषयी भाविकांचे मत समजून घ्यायला हवे ! – श्री. अशोक घेगडे, विश्‍वस्त, विघ्नहर गणपति मंदिर

श्री. अशोक घेगडे म्हणाले, ‘‘सर्वसामान्य भाविक होऊन त्यांच्यामध्ये मिसळून विश्‍वस्तांनी मंदिर व्यवस्थापनाविषयीचे भाविकांचे मत समजून घ्यायला हवे. यावरून ‘विश्‍वस्तांचे कार्य कसे चालले आहे ?’, हे त्यांच्या समजून येईल. मंदिराचा निधी विकास कामासाठी नव्हे, तर मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी वापरायला हवा.’’

दर्शनासाठी रांगेमध्ये असलेले वृद्ध, गरोदर स्त्रिया आदींसाठी थेट दर्शनाची व्यवस्था करावी ! – दिलीप देशमुख, माजी धर्मादाय आयुक्त

‘विश्‍वस्तांनी एकदा तरी भाविकांप्रमाणे रांगेत उपस्थित राहून भगवंताचे दर्शन घ्यावे. यामुळे भाविकांना होणारा त्रास त्यांच्या लक्षात येऊ शकेल. रांगेमध्ये वृद्ध, गरोदर स्त्रिया, नवविवाहित दांपत्य असल्यास त्यांना थेट दर्शनाची व्यवस्था करायला हवी.