हिंदु नेते असुरक्षित !

सध्‍या देशात राजस्‍थान, मध्‍यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगाणा आणि मिझोराम या ५ राज्‍यांच्‍या निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. यानिमित्त विविध राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर चिखलफेक करतांना दिसत आहेत. अशात तेलंगाणा येथे एक वेगळाच प्रकार घडला. येथे एम्.आय.एम्.चे अध्‍यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी हे घरोघरी जाऊन प्रचार करत होते. त्‍या वेळी एक धर्मांध महिला असदुद्दीन ओवैसी यांना उद्देशून म्‍हणाली, ‘‘हा (असदुद्दीन ओवैसी) वाघिणीचा मुलगा आहे. विरोधकांना संपवून टाका. सगळे जग तुमच्‍या पाठीमागे उभे आहे. राजासिंह (भाजपचे उमेदवार तथा प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ टी. राजासिंह) याच्‍या विरोधात कुणाला तरी उभे करा. मला त्‍याच्‍या विरोधात उभे करा. मी त्‍याची हत्‍या करते.’’ निवडणुकीच्‍या प्रचारसभेत विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्‍यारोप करणे, हे एकवेळ समजण्‍यासारखे आहे; परंतु प्रतिस्‍पर्धी प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ उमेदवाराची थेट हत्‍या करण्‍याचीच धमकी देण्‍याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. यावरून ‘धर्मांधांना निवडणूक लढवायची आहे ? कि दंगली घडवायच्‍या आहेत ?’, असा प्रश्‍न निर्माण होतो.

या महिलेने अशी धमकी दिल्‍यानंतर खरे तर ओवैसी यांनी तिला तात्‍काळ रोखायला हवे होते किंवा तिला तंबी द्यायला हवी होती; परंतु ते काहीही बोलले नाहीत. यावरून ‘तिच्‍या विचारांना ओवैसी यांचे समर्थन आहे’, असा अर्थ निघतो. निवडणूक आयोगाने या घटनेची तात्‍काळ नोंद घेऊन सदर महिला अणि ओवैसी यांच्‍यावर कठोर कारवाई केली पाहिजे. अशी धमकी समजा कुठल्‍या हिंदूने दिली असती, तर काँग्रेस, साम्‍यवादी पक्ष आणि कथित पुरोगामी गप्‍प बसले असते का ? यावरून या सर्वांमध्‍ये ठासून भरलेला हिंदुद्वेष दिसून येतो. एरव्‍ही ‘भारतात अल्‍पसंख्‍य असुरक्षित आहेत’, अशी ओरड काँग्रेसपासून विदेशातील हिंदुद्वेषी संस्‍थांपर्यंत सर्वच जण करत असतात; पण त्‍यांना हे सांगितले पाहिजे की, भारतात हिंदूच खर्‍या अर्थाने असुरक्षित आहेत आणि त्‍यांना धर्मांधांपासून धोका आहे. दुसरीकडे हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या भाषणांना प्रक्षोभक ठरवून त्‍यांच्‍याविरुद्ध ‘हेट स्‍पीच’च्‍या अंतर्गत कारवाई करणारे पोलीसही आता नेहमीप्रमाणे हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून गप्‍प आहेत. त्‍यांना हे विधान द्वेषपूर्ण आणि चिथावणीखोर वाटत नाही का ? एकूणच या देशात हिंदूंना कुणीही वाली नाही, हेच स्‍पष्‍ट होते. यासाठी हिंदु राष्‍ट्र अनिवार्य आहे !

हिंदु धर्म, धर्मग्रंथ, देवता, राष्‍ट्रपुरुष आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांच्‍याकडे वक्रदृष्‍टीने पहाण्‍याचे धाडस कुणी करणार नाही, अशी पत हिंदूंनी निर्माण करावी !