वाराणसी आश्रमात झालेल्या ‘श्री वाराहीदेवी यज्ञा’च्या वेळी तेथील साधिकांना आलेल्या अनुभूती !

११.८.२०२० या दिवशी वाराणसी येथील आश्रमात ‘श्री वाराहीदेवी यज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी वाराणसी आश्रमातील साधिकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

कु. सुमन सिंह

१. कु. सुमन सिंह (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय २५ वर्षे)

१ अ. ‘यज्ञाचा शुभारंभ होताच मला माझ्या शरिरात ऊर्जा आणि हलकेपणा जाणवत होता.

१ आ. यज्ञाच्या ३ दिवस आधी मला शारीरिक अस्वास्थ्य जाणवत होते; परंतु यज्ञ झाल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून मला काहीच त्रास जाणवला नाही.

१ इ. यज्ञाच्या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याकडे पहात असतांना मला त्यांच्या जागी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन होत होते.

१ ई. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे यज्ञातून निघणारा धूर दीर्घ श्वास घेऊन ग्रहण केल्यावर आलेल्या अनुभूती

१. यज्ञाच्या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी साधकांना यज्ञाच्या आहुतीतून निघणारा धूर दीर्घ श्वास घेऊन ग्रहण करण्यास सांगितले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे केल्यावर माझ्या मनातील असंख्य विचार नष्ट होऊन माझे मन निर्विचार झाले आणि त्यानंतर माझ्याकडून सतत श्री वाराहीदेवीचे नामस्मरण होऊ लागले.

२. ‘साक्षात् श्री वाराहीदेवीच आहुती ग्रहण करत आहे’, असे मला जाणवत होते.’

२. कु. कुहू पांडेय

कु. कुहु पाण्डेय

२ अ. यज्ञ चालू झाल्यावर वातावरणात लाल रंगाची छटा दिसू लागणे आणि नंतर श्री वाराहीदेवीचे चित्र पाहिल्यावर तिच्या मूर्तीतील मुखाचा रंग लाल असल्याचे लक्षात येणे : ‘यज्ञाचा शुभारंभ झाल्यावर मला वातावरणात लाल रंगाची छटा दिसू लागली. मला माझ्या शरिरात अकस्मात् पुष्कळ उष्णता जाणवू लागली. यापूर्वी मी कधीही श्री वाराहीदेवीचे दर्शन घेतले नव्हते; परंतु यज्ञाला आरंभ होताच मला जाणवले, ‘यज्ञस्थळी श्री वाराहीदेवीचे मारक तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत झाले असून ती मारक रूपात हातामध्ये तलवार घेऊन तेथे विराजमान झाली आहे.’ त्याच दिवशी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु नीलेश सिंगबाळ हे वाराणसी येथील श्री वाराहीदेवीच्या दर्शनासाठी गेले होते. नंतर मी देवीचे चित्र पाहिले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘श्री वाराहीदेवीच्या मूर्तीतील तिच्या मुखाचा रंगही लाल आहे.’

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक