‘मुशायरा’ (बक्षीस) योजनेअंतर्गत १२ वर्षांत एकालाही नाही दिले बक्षीस !

‘मुशायरा योजना’ रहित करण्याचा निर्णय !

पुणे – महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडे अपुरी कर्मचारी संख्या आहे. त्यामुळे शहरातील कर आकारणी न झालेल्या मिळकती शोधून देणार्‍या नागरिकांना, तसेच महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या कर्मचार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने वर्ष २०१० – ११ मध्ये ‘मुशायरा’ (बक्षीस) देण्याचा ठराव केला होता; मात्र १२ वर्षे महापालिकेने एकाही नागरिकाला या ठरावाच्या अंतर्गत बक्षीस दिले नाही.

या ठरावाचा उपयोग मिळकतधारकास अडकवण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे महापालिकेने ‘मुशायरा योजना’ रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचार्‍यांप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांनी अशी माहिती कळवल्यास त्यांनाही काही रक्कम मुशायरा म्हणून द्यावी, अशी सूचना महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष नीलेश निकम यांनी प्रशासनाला देऊन हा प्रस्ताव संमत केला होता; मात्र या प्रावधानांचा लाभ होण्यापेक्षा त्या आधारे वैयक्तिक भांडणातून अनेकांना अडकवण्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे या उपाययोजनांचा लाभ होत नसल्याने ही योजना बंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.

संपादकीय भूमिका

योजना चालू करण्यापूर्वी तिचा अभ्यास झाला नाही का ? बक्षीस देण्याचे गाजर दाखवल्याने महापालिकेच्या अशा योजनांवर कुणी विश्‍वास ठेवेल का ?