३ मुलींची हत्या करणार्‍या बिहारमधील जोडप्याला अटक !

पोटच्या मुलांचा सांभाळ करू न शकल्याने ३ मुलींना पाजले विष

जालंधर (पंजाब) – बिहारमधील कटिहार येथील एक जोडपे त्यांच्या ४ मुली आणि १ मुलगा यांसह कानपूर, जालंधर येथे रहात होते. या जोडप्याने स्वत:च्या ३ मोठ्या मुलींना विष मिसळलेले दूध प्यायला दिले. तिन्ही मुलींचा तडफडून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आई-वडिलांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सुशील मंडलला दारू पिण्याचे व्यसन होते. त्याची कमाई अल्प होती. त्यामुळे पाचही मुलांचा सांभाळ करू शकत नसल्याने त्याने पत्नीच्या साहाय्याने स्वत:च्या ३ मोठ्या मुलींची हत्या केली. स्वत:च्या बचावासाठी सुशील आणि त्याची पत्नी मंजूदेवी यांनी मुलींचे अपहरण झाल्याचे खोटे कथानक रचले; पण पोलिसांनी झडती घेताच सत्य घटना समोर आली. पोलिसांनी सुशील मंडल आणि त्याची पत्नी मंजूदेवी यांना अटक केली. या जोडप्याची उर्वरित दोन मुले अनुष्का (२ वर्षे) आणि शनी (१ वर्ष) यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.