उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गे आणि ए. राजा यांना अटक न केल्यास देशभर आंदोलन करणार ! – हिंदु जनजागृती समितीची चेतावणी

सनातन धर्माची डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स आणि कुष्ठरोग यांच्याशी तुलना अक्षम्यच !

ए. राजा, प्रियांक खर्गे आणि उदयनिधी स्टॅलिन

मुंबई – विश्‍वबंधुत्वाची शिकवण देऊन सर्वांना सामावून घेणार्‍या सनातन धर्माची डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स आणि कुष्ठरोग या रोगांशी तुलना करून सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणारे तमिळनाडूतील द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम – द्रविड प्रगती संघ) सरकारचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खरगे आणि तमिळनाडूतील द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी देशभरातील कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. ते सर्व जण त्यांच्या वक्तव्यांवर ठाम आहेत. त्यामुळे देशभरात हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे या तिघांवर भारतीय दंड संहिता कलम १५३(अ), १५३(ब), २९५(अ), २९८, ५०५ आणि ‘आय.टी. अ‍ॅक्ट’ अंतर्गत तात्काळ गुन्हे नोंदवावेत, या सर्वांवर ‘राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रा.सु.का.)’ अंतर्गत कारवाई करून त्यांना अटक करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. यांच्यावर कारवाई झाली नाही, तर देशभरात तीव्र आंदोलने करू, अशी चेतावणीही समितीने दिली आहे. या संदर्भातील मागणीचे निवेदन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवले आहे.

…तर देशातील शांतता, एकता आणि अखंडता धोक्यात येईल !

समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, देशातील विरोधी पक्षांचा समावेश असलेल्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक मुंबईत झाल्यानंतर त्यातील सहभागी काही पक्षांकडून सनातन धर्माला लक्ष्य करण्याची चढाओढ लागली आहे. कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेवर घाला घालून देशाची एकता, अखंडता आणि शांतता धोक्यात आणली जात आहे. मंत्री आणि खासदार या घटनात्मक पदांवर असलेल्या विविध उत्तरदायी व्यक्तींकडून अशा प्रकारची वक्तव्ये होणे, हा एकप्रकारे लोकशाहीचा पराभव आहे. अशा प्रकारे इस्लाम, ख्रिस्ती आदी धर्मांविषयी वक्तव्ये करणाचे धाडस या राजकीय पक्षांमध्ये वा त्यांच्या नेत्यांमध्ये आहे का ? वारंवार भडकाऊ वक्तव्ये करून हिंदूंना लक्ष्य करणार्‍या अशा कायदाद्रोही लोकप्रतिनिधींना केवळ मंत्रीमंडळातून नव्हे, तर विधीमंडळ आणि संसद यांतूनच बडतर्फ केले पाहिजे. इतर वेळेला हिंदूंच्या विरोधात तत्परतेने ‘हेट स्पीच’चे (आक्षेपार्ह विधानांचे) गुन्हे नोंदवण्याचे आदेश पोलिसांना दिले जातात; मात्र अनेक दिवस अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन सनातन धर्माविषयी वक्तव्ये होत असतांना सर्वोच्च न्यायालयानेही याविषयी ‘सुमोटो’ (स्वतःहून नोंद घेऊन सुनावणी करणे) कारवाई केलेली नाही, हे दुर्दैवी आहे.

धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या अशा नेत्यांवर गुन्हे नोंदवून त्यांना शिक्षा दिली नाही, तर देशातील शांतता, एकता आणि अखंडता धोक्यात येईल, तसेच देशात दंगली घडवून अराजक माजवण्याचा सदर आरोपींचा उद्देश यशस्वी होईल. जर असे झाले, तर त्याला संपूर्णपणे पोलीस आणि प्रशासन उत्तरदायी असेल, अशीही चेतावणी समितीने दिली आहे.