भारताने केली नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे कारवाईची मागणी !

नेपाळमधील चीनच्या राजदूतांचे भारतविरोधी विधानांचे प्रकरण

नेपाळचे पंतप्रधान प्रचंड व चीनचे राजदूत चेन सोंग

नवी देहली – नेपाळमधील चीनच्या राजदूतांनी भारताच्या विरोधात विधाने केल्यानंतर आता भारताच्या काठमांडू येथील दूतावासाने नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे याविषयी विचारणा करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नेपाळचे परराष्ट्रमंत्री एन्.पी. सौद यांनी म्हटले की, आम्ही चीनच्या राजदूतांना नोटीस बजावली आहे.

१. नेपाळच्या अनेक राजकीय मुत्सद्यांनी चीनच्या राजदूतांच्या विधानाचा विरोध केला आहे. ‘चीनच्या राजदूतांनी नेपाळमध्ये भारताच्या विरोधात अनावश्यक वाद निर्माण केला आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.

२. माजी पंतप्रधान शेर बहादुर देउबा सरकारमध्ये पंतप्रधानांचे सल्लागार राहिलेले अरुण सुबेदी यांनी म्हटले की, नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांच्या सरकारने चीनला एक पत्र पाठवून त्यांच्या राजदूताच्या विधानाचा विरोध केला पाहिजे. प्रश्‍न हा आहे की, जर भारतीय राजदूतही अशा प्रकारचे विधान करतील, तर नेपाळचे उत्तर काय असणार आहे ? प्रचंड यांचे सरकार चीनच्या राजदूतांच्या विधानांवर मौन बाळगून आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडून चीनच्या राजदूतांच्या विधानांचा विरोध

नेपाळच्या पंतप्रधान कार्यालयाने चीनच्या राजदूताच्या विधानाला अराजकीय घोषित केले आहे. त्याने म्हटले आहे की, चीनचे राजदूत नेपाळच्या अंतर्गत प्रकरणांत अशा प्रकारचे विधान करू शकत नाहीत. तसेच शेजारी देशांविषयी आमच्या संबंधांवर आणि ज्यांच्यावर आम्ही मोठ्या प्रमाणात अवलंबून आहोत त्यांच्यावर टिपणी करू शकत नाहीत.

संपादकीय भूमिका

नेपाळकडे चिनी राजदूतांवर कारवाई करण्याची शक्ती नाही. त्यामुळे असे काही घडू शकणार नाही. भारतानेच चीनला जशास तसे उत्तर देत राहिले पाहिजे !