पाद्री बॉलमॅक्‍स पेरेरा यांचे बोल गोमंतकियांचा अनादर करणारे !

‘छत्रपती शिवाजी महाराज राष्‍ट्रपुरुष आहेत. त्‍यांना देव म्‍हणू नका’, अशा आशयाचे वक्‍तव्‍य गोव्‍यातील पाद्री बॉलमॅक्‍स पेरेरा यांनी अलीकडेच केले. पाद्री बॉलमॅक्‍स पेरेरा यांनी केलेल्‍या विधानावरून उठलेली राळ, तसेच अस्‍मितेच्‍या प्रश्‍नाचा धुरळा एव्‍हाना खाली बसू लागला आहे; पण त्‍यांच्‍या छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्‍या विधानाकडे पाहिल्‍यास त्‍यांनी समस्‍त गोमंतकियांचा अपमान केला, ज्‍याकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नाही, हे लक्षात येते.

‘शिवाजी महाराजांना देवत्‍व बहाल करू नका, त्‍यांची आरती करू नका, पूजा करू नका’, हा विचार महाराष्‍ट्रातील अनेक विचारवंतांनीही मांडला आहे. ज्‍यांना छत्रपती शिवाजी महाराजांना देवत्‍व बहाल करायचे आहे, ते करतीलच. पाद्री बॉलमॅक्‍स यांनी सांगितले म्‍हणून गोमंतकीय ख्रिस्‍ती त्‍यांच्‍या हिंदु शेजार्‍याला जाऊन ‘शिवाजी महाराज देव नाहीत, त्‍यांना देव मानू नका’, असे सांगणार नाही. सांगितले तरी कुणी ऐकणार आणि मानणार नाही.

शिवजयंती, शिवराज्‍याभिषेक, छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या इतिहासाविषयी लिहिणे, बोलणे आणि अभिमान बाळगणे या पलीकडे जाऊन जाळपोळ, ख्रिस्‍त्‍यांना मारणे, चर्च पाडणे असले उद्योग कदापि करणार नाहीत. कट्टरातील कट्टर शिवप्रेमीचा तसा इतिहास नाही. गोवेकरांची ती मूळ प्रवृत्तीच नाही. म्‍हणूनच पाद्री बॉलमॅक्‍स यांनी समस्‍त गोमंतकियांचा अपमान केला आहे.

(श्री. प्रसन्‍न बर्वे यांच्‍या ‘प्रसन्‍नवदने’ या ‘ब्‍लॉगस्‍पॉट’वरून हा लेख घेतला असून त्‍यासाठी ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह त्‍यांचा आभारी आहे. – संपादक)

१. मणीपूरमधील ख्रिस्‍त्‍यांवर झालेल्‍या आक्रमणावरून गोव्‍यातील शिवप्रेमींविषयी बोलणे हे अपमानजनक !

पाद्री बॉलमॅक्‍स यांचे पूर्ण ‘शेरमांव’ (प्रवचन) ऐकल्‍यास वा पाहिल्‍यास याची खात्री पटेल. त्‍यांच्‍या प्रवचनाचा रोख ‘येशू ख्रिस्‍तावर विश्‍वास कसा ठेवावा ?’, ‘संकटकाळात आपला धीर न सोडता ख्रिस्‍त पंथानुसार कसे चालावे ?’, यांविषयी होते. अगदी प्रारंभीपासून त्‍यांनी दिलेली उदाहरणे त्‍यांची भूमिका स्‍पष्‍ट करत जातात. ‘जसा ख्रिस्‍तावर, ख्रिस्‍त पंथियांवर प्रारंभीपासून आक्रमणे होत आहेत, तशीच ती आताही होत आहेत आणि भविष्‍यातही होत रहातील. त्‍याला ख्रिस्‍त्‍यांनी धैर्याने तोंड कसे द्यावे’, याविषयी त्‍यांनी अनेक गोष्‍टी सांगितल्‍या. मग ते गोव्‍यातील शिवप्रेमींवर बोलले, कळंगुटमध्‍ये झालेल्‍या घटनेविषयी (एक विदेशी पर्यटक तेथील परिसराचे ध्‍वनीचित्रीकरण करत असतांना तेथील लोकांनी ‘ही मुसलमान गल्ली आहे’, असे सांगणे) बोलले. गोव्‍यातील परिस्‍थिती आणि शिवप्रेमी यांच्‍याविषयी बोलण्‍याचा संदर्भ मणीपूरमधील ख्रिस्‍त्‍यांवर झालेल्‍या आक्रमणावरून आला. इथेच पाद्री बॉलमॅक्‍स यांनी ख्रिस्‍ती, हिंदु, मुसलमान असलेल्‍या समस्‍त गोमंतकियांचा अपमान केला.

२. शिवप्रेमी कट्टर असते तर…

‘जेव्‍हा आपण एखाद्या ठिकाणी घडलेल्‍या घटना इथेही घडू शकतील’, असा तर्क मांडतो, तेव्‍हा ‘दोन्‍ही ठिकाणची परिस्‍थिती, प्रवृत्ती आणि प्रकृती समान असावी लागते, तरच तशा घटनांची पुनरावृत्ती इतर ठिकाणी घडू शकेल’, असे गृहीतक आपण मांडू शकतो. मणीपूर आणि गोवा येथील परिस्‍थिती पूर्णपणे भिन्‍न आहे. स्‍वातंत्र्यानंतर मणीपूर अनेकदा पेटले आहे, जसे ते आज पेटले आहे. ‘राज्‍यात भाजपचे हिंदुत्‍वनिष्‍ठ सरकार असल्‍याने शिवप्रेमी आक्रमक झाल्‍याने मणीपूरसारखी परिस्‍थिती इथे उद़्‍भवू शकते’, असे विधान त्‍यांनी करणे, हा समस्‍त गोमंतकियांचा अपमान आहे. गोवा मुक्‍त होण्‍याच्‍या आधीपासून शिवप्रेमी गोव्‍यात आहेत. एक वेळ देवाला न मानतील; पण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे इतके कट्टर शिवप्रेमी गोव्‍यात फार पूर्वीपासून आहेत. चिथावणी देण्‍यासाठी नव्‍हे, तर माझा मुद्दा स्‍पष्‍ट करण्‍यासाठी एक विधान करतो, ‘इतकी देवळे पाडली, पाडून चर्च बांधले आहेत, तसेच करायचे असते, तर पोर्तुगीज गेल्‍यानंतर एक तरी चर्च गोव्‍यात शिल्लक राहिले असते का ? भारतात एक तरी मशीद शिल्लक राहिली असती का ?’, थोडा विचार करून पहा.

३. ‘आपली हिंदु संस्‍कृती आहे’, हे म्‍हणणे प्रत्‍येक विचारधारेच्‍या विचारवंतांच्‍या जीवावर येणारे !

आता अनेक विचारवंत असेही म्‍हणतील, ‘अरे, विविधतेत एकता’ हीच तर आमची संस्‍कृती आहे.’ मान्‍य आहे; पण यातील एकही विचारवंत ‘त्‍या संस्‍कृतीचे नाव काय ?’, या प्रश्‍नाचे उत्तर देत नाही. ‘एकत्र जगणे, समावेशक असणे’, ही हिंदु संस्‍कृतीची वैशिष्‍ट्ये आहेत. भारतातील प्रत्‍येक ख्रिस्‍ती, मुसलमान मूलत: हिंदु संस्‍कृतीचाच भाग आहेत. मग समस्‍या कुठे आहे ? ‘आपण हिंदु संस्‍कृतीचा भाग नाही, आपण वेगळे आहोत’, हे दाखवण्‍यात समस्‍या आहे. ‘आपली हिंदु संस्‍कृती आहे’, हे म्‍हणणे प्रत्‍येक विचारधारेच्‍या विचारवंतांच्‍या जीवावर येते. मग तो ख्रिस्‍ती, इस्‍लामी, साम्‍यवादी, सेक्‍युलर (निधर्मी), पुरोगामी कुठल्‍याही विचारधारेचा कुणीही विचारवंत असो.

४. ‘इतर संस्‍कृतींना संपवून स्‍वतःचा सांस्‍कृतिक विस्‍तार करणे’, हा ख्रिस्‍ती आणि इस्‍लाम यांचा स्‍थायी भाव !

ख्रिस्‍ती पंथ, इस्‍लाम यांच्‍या उदयापासून हे अब्राहमिक पंथ (एकेश्‍वरवादाचा पुरस्‍कार करणार्‍यांना ‘अब्राहमिक’ म्‍हणतात. यामध्‍ये ख्रिस्‍ती, इस्‍लाम आणि ज्‍यू यांचा समावेश आहे.) कधीच सर्वसमावेशक नव्‍हते आणि नाहीत. एकत्र रहाणे, इतरांच्‍या विचारधारेचा आदर करणे, सहअस्‍तित्‍व या गोष्‍टी त्‍यांच्‍या संहितेतच नाहीत. दुर्दैवाने राज्‍यघटनेमध्‍ये हा सांस्‍कृतिक विस्‍तारवाद रोखण्‍यासाठी काहीही प्रावधान (तरतूद) नाही; उलट ‘तो कसा विस्‍तारेल ?’, याचीच काळजी घेतली गेली आहे. म्‍हणूनच ‘काश्‍मीरमध्‍ये हिंदूंच्‍या हत्‍या, नरसंहार केवळ ते हिंदू आहेत’, या एकाच कारणासाठी होऊनही न्‍याय यंत्रणेला त्‍याची चौकशीही करावीशी वाटत नाही. वर्ष १९८४ च्‍या दंगलीची चौकशी कालबाह्य होत नाही; पण १९८९ चा नरसंहार मात्र कालबाह्य होतो. ‘ख्रिस्‍ती पंथ सेवेचा आणि इस्‍लाम शांततेचा मुलामा ओढून वावरत असला, तरीही इतर संस्‍कृतींना संपवून स्‍वतःचा सांस्‍कृतिक विस्‍तार करणे’, हा दोन्‍ही पंथांचा स्‍थायी भाव आहे. जागतिक इतिहास काढून पहा, जागोजागी याची साक्ष मिळेल. तरीही पटतच नसेल, तर एक प्रश्‍न स्‍वत:लाच विचारा. जर सहअस्‍तित्‍व, एकत्र जगणे, इतर संस्‍कृतींचा आदर ठेवून आपले अस्‍तित्‍व निर्माण करणे, हा ख्रिस्‍ती आणि इस्‍लाम यांचा स्‍थायी भाव असता, तर संपूर्ण भारतात मंदिरे का पाडली गेली ? मूर्ती फोडून मशिदीच्‍या पायर्‍या का बनवल्‍या गेल्‍या ? गोव्‍यात मंदिर ठेवून चर्च बांधण्‍यासाठी भूमीच नव्‍हती का ? राज्‍यकर्ते असलेल्‍या पोर्तुगिजांना चर्च बांधण्‍यास कुणी भूमी दिली नसती का ? तरीही मंदिरे पाडली गेली, खानपानापासून सगळे निर्बंध लादले गेले. प्रसंगी आई-वडिलांसमोर मुलांना जिवंत जाळले गेले. या सगळ्‍या जखमा ठाऊक असलेल्‍या समाजाची प्रतिक्रिया जराशी हिंसक झाली असती तर ?

ख्रिस्‍ती आणि इस्‍लाम पंथ जगाची दोन भागांत सरळ सरळ विभागणी करतो. त्‍यामुळे जे ख्रिस्‍ती किंवा मुसलमान नाहीत, त्‍यांना योग्‍य मार्गावर आणून स्‍वर्गात पोचवणे, हे त्‍यांचे आद्य आणि परम कर्तव्‍य आहे. म्‍हणूनच ‘येशू ख्रिस्‍त किंवा अल्ला यांच्‍याखेरीज इतर कुणाचेही प्रस्‍थ वाढणे, हा आपल्‍या अस्‍तित्‍वाला निर्माण झालेला धोका आहे’, अशी त्‍यांची प्रामाणिक समजूत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना देव मानल्‍याने ख्रिस्‍ती पंथाच्‍या अस्‍तित्‍वास धोका कसा पोचेल ? पण ही भीती त्‍यांना आहे; कारण त्‍यांनी तेच करून (येशू ख्रिस्‍ताचे प्रस्‍थ वाढवून) आपला सांस्‍कृतिक विस्‍तार केला आहे. म्‍हणूनच पाद्री बॉलमॅक्‍स त्‍यांच्‍या प्रवचनात ख्रिस्‍त्‍यांना आवाहन करतात, ‘हिंदूंना सांगा, शिवाजी महाराज राष्‍ट्रीय महापुरुष आहेत, आदर्श राजा आहेत; पण देव नाहीत आणि त्‍यांना देव म्‍हणू नका.’

५. दैनिक ‘लोकसत्ता’ने ‘असंतांचे संत’ नावाचा अग्रलेख मागे घेण्‍यामागील कारण !

‘असंतांचे संत’ नावाचा अग्रलेख दैनिक ‘लोकसत्ता’मध्‍ये छापून आला होता. त्‍या वेळी कुणीही अटक करण्‍याची मागणी केली नाही, कुणीही रस्‍त्‍यावर येऊन मोर्चे काढले नाहीत, साधा निषेधही व्‍यक्‍त केला नाही. तरीही दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी दुसर्‍याच दिवशी संपूर्णच्‍या संपूर्ण अग्रलेख पहिल्‍या पानावर थेट क्षमा मागत मागे घेतला. वृत्तपत्राच्‍या इतिहासात हे असे बहुधा पहिल्‍यांदाच घडले असावे. ‘यामागे कुठला संघटनात्‍मक अंत:प्रवाह (अंडर करंट) कार्यरत होता’, हे वेगळे सांगण्‍याची आवश्‍यकता नाही.

६. संघटनात्‍मक अंत:प्रवाह विवेक प्रत्‍येक शिवप्रेमीने ठेवायला हवा !

पाद्री बॉलमॅक्‍स यांनी केलेल्‍या समस्‍त गोमंतकियांच्‍या अपमानाचा खरेतर निषेध व्‍हायला हवा होता. अस्‍मितेच्‍या ठिणग्‍या नको तिथेच पेटू लागल्‍या की, अशी फसगत होते. सांस्‍कृतिक विस्‍तारवादाला पायबंद घालण्‍याची आणि त्‍यामागील संहितेतील विचारधारेला रोखण्‍याची आवश्‍यकता आहे. अन्‍यथा काश्‍मीरप्रमाणेच ही समस्‍या कधीच सुटणार नाही; कारणे, संदर्भ पालटत रहातील. बॉलमॅक्‍ससारख्‍या ठिणग्‍या पडत रहातील. कुठे पेटायचे ? कुठे पेटून उठायचे ? याचा आणि त्‍याविरुद्ध काय करावे ? याचा संघटनात्‍मक अंत:प्रवाह विवेक प्रत्‍येक शिवप्रेमीने ठेवलाच पाहिजे.’

– श्री. प्रसन्‍न शिवराम बर्वे, पणजी, गोवा. (९.८.२०२३)