चंद्रावर ‘चंद्रयान-३’ उतरल्याच्या जागेचे ‘शिवशक्ती’ असे नामकरण !

पंतप्रधान मोदी यांची घोषणा

बेंगळुरू (कर्नाटक) – ज्या जागेवर ‘चंद्रयान-३’चे ‘विक्रम लँडर’ उतरले, ते ठिकाण यापुढे ‘शिवशक्ती’ या नावाने ओळखले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. अंतराळ मोहिमेत प्रत्यक्ष उतरण्याच्या जागेला (‘टच डाऊन पॉईंट’ला) एक नाव देण्याची वैज्ञानिक परंपरा आहे. याच आधारावर भारताने ‘विक्रम लँडर’ उतरल्याच्या स्थळाला ‘शिवशक्ती’ नाव दिले आहे.

‘शिवशक्ती’ या शब्दाचा अर्थ विशद करतांना पंतप्रधान म्हणाले की,

१. ‘शिवा’मध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे आणि ‘शक्ती’मुळे त्या संकल्पांना पूर्ण करण्यासाठी सामर्थ्य मिळते. चंद्रावरील ‘शिवशक्ती पॉइंट’ हा हिमालयाला कन्याकुमारीशी जोडल्याचा बोध करून देत आहे.

२. ज्या मनाने आपण कर्तव्य कर्म करतो, तसेच विचार आणि विज्ञान यांना गती देतो , ते मन शुभ आणि कल्याणकारी संकल्पाशी जोडलेले रहावे. यासाठी शक्तीचा आशीर्वाद अनिवार्य आहे. ही शक्ती, म्हणजे आपली नारी शक्ती होय.

ज्या ठिकाणी ‘चंद्रयान-२’ उतरले होते, त्या जागेचे ‘तिरंगा’ असे नामकरण !

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ४ वर्षांपूर्वी ‘चंद्रयान-२’ चंद्रापर्यंत पोचले होते, तेव्हा प्रस्ताव होता की, त्या जागेचे नाव ठरवले जाईल; पण त्या वेळी आम्ही ठरवले होते की, जेव्हा ‘चंद्रयान-३’ यशस्वीरित्या चंद्रावर पोचेल, तेव्हा आम्ही दोन्ही ‘पॉईंटस’ला एकत्रितपणे नावे देऊ. त्यामुळे ‘चंद्रयान-२’ने जिथे उतरले होते, ती जागा यापुढे ‘तिरंगा’ या नावाने ओळखली जाणार आहे. हा ‘तिरंगा पॉइंट’ आपल्याला शिकवण देईल की, कोणतेही अपयश शेवटचे नसते. जर दृढ इच्छाशक्ती असेल, तर यश प्राप्त होतेच.

संपादकीय भूमिका

यावरून आता कथित धर्मनिरपेक्षतावादी, साम्यवादी आणि पुरो(अधो)गामी यांच्याकडून ‘चंद्रयान-३’ आणि ‘इस्रो’ यांचे भगवेकरण होत असल्याचा आरोप झाला, तर नवल वाटू नये !